कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता, पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहेत, अशी टीका काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पुण्याचे पोलिस आयुक्त आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड केली, पुढे काय झालं . आता पुण्यात जाऊन हफ्ते वसूली करण्यात व्यस्त आहेत का, असा सवाल करीत पोलिसांचा धाक उरलेला नाही, त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. पुणे बस स्थानकातील बसमध्ये जे सामान सापडले, बसचा वापर हा महिलांवर अत्याचार करण्यासाठी होत होता का? तिथे सुरक्षा रक्षक असताना बलात्कार घडला राज्यात गृह खात्याची इभ्रत गेली. येत्या अधिवेशनात आम्ही प्रश्न उपस्थित करू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सुरक्षाराज्यात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सुरक्षा दिली जाते. राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ते आरएसएस संबंधित असल्याने त्यांना अभय दिले जाते. भाजप यांच्या विरोधात निषेध करत नाही, आता तोंड का शिवली गेली,असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.