रहाटे कॉलनीत सुविधांचा अभाव : रस्ते बेहाल,चेंबरचे झाकण गायब, सर्वत्र पसरली घाणनागपूर : स्वच्छता, दुरुस्ती व देखरेखीच्या बाबतीत मनपाची उदासीनता नागरिकांच्या जीवावर बेतू शकते अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. यामुळे रस्त्यावर चालणारे पादचारी व वाहनधारकही दहशतीत आले आहेत. परंतु हे चित्र बदलण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. परिणामी कालपर्यंत अतिशय क्षुल्लक भासणारी समस्या आता विक्राळ रूप धारण करीत आहे. समस्यांच्या या विळख्यात आता रहाटे कॉलनीही आली आहे.लोकमतची चमू या परिसरात पोहोचली तेव्हा वरून सर्व सुविधांनी सज्ज भासणाऱ्या या कॉलनीचे भयाण वास्तव पुढे आले. नागरी सुविधांच्या संदर्भात मनपाची उदासीनता येथे स्पष्ट नजरेस पडत होती. शहरातील पॉश कॉलनींमध्ये जिची गणना होते त्या रहाटे कॉलनीमध्ये पादचाऱ्यांसोबतच वाहनचालकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या परिसरात एकही रस्ता असा नाही जिथे खड्डे नाहीत. येथे जी जंगल-झुडपे वाढली आहेत त्यात कचऱ्याचे ढिग जमा झाले आहेत. यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना आजारी पडण्याची भीती कायम सतावत असते. समस्यांचे ग्रहण येथेच सुटत नाही. सध्या पावसाळा असल्याने फुटपाथवर झुडपे व गवताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तर फुटपाथ नजरेसच पडत नाही. फुटपाथवरील चेंबरचे झाकण गायब आहेत. लोकमतच्या चमूला येथे काही असेही चेंबर दिसले ज्यावर झाकण लावण्याऐवजी त्यावर मोठे दगड ठेवून काम भागवण्यात आले आहे. रस्त्याच्या शेजारील एका चेंबरचे झाकण जीर्ण झाले आहे. ज्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याशेजारील झाडांच्या फांद्या जमिनीवर झुलत असतात. आधी पावसाळ्यात या फांद्यांची छटाई व्हायची पण यंदा ती अद्याप झाली नाही. या संदर्भात मनपा प्रशासन व नगरसेवकांकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु अद्याप कुणीच दखल घेतली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)समस्या लवकरच दूर होतीलया समस्यांबाबत विचारणा करण्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक संदीप जोशी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, या प्रभागातील समस्यांचे नेहमीच प्रमुखतेने निराकरण केले जाते. हे खरे आहे की फुटपाथची स्थिती योग्य नाही. झाडाच्या फांद्या वाकल्या आहेत. परंतु या समस्या दूर करण्यासाठी येत्या दोन दिवसात ठोस पावले उचलली जातील.
जीवावर बेतू शकते अक्षम्य दुर्लक्ष
By admin | Updated: August 25, 2016 02:24 IST