लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - इमामवाड्यात जुन्या वादातून तर सदरमध्ये वाहन वापरायला दिले नाही म्हणून वाद झाल्यानंतर दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. इमामवाड्यातील घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास तर सदरमधील घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
अनमोल राजू डाखोरे (वय २३, रा. अंबाझरी), शैलेश श्रीचंद ठाकूर (वय १९, रा. कच्चीधान, छिंदवाडा), विवेक कैलास गुप्ता (वय २४, रा. बिनाकी मंगळवारी) आणि त्यांचा एक १५ वर्षीय साथीदार यांचा शुक्रवारी रात्री करण शिवाजी अंकूशे (वय२९, रा. गायत्रीनगर, जगनाडे चाैक) सोबत वाद झाला होता. त्यावरून रात्री ९ च्या सुमारास आरोपींनी करण तसेच त्याचा मित्र अविनाश पुंडलिक महाडोळे या दोघांना राजाबाक्षा हनुमान मंदिराजवळ गाठले. त्यांना शिवीगाळ करत घातक शस्त्राने अविनाशवर हल्ला चढवला. डोक्यावर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. अविनाश आणि करणने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. परिणामी आरोपी पळून गेले. करणने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना सदरमधील सुदर्शन मोटर्सजवळ मध्यरात्री घडली. साहिल नामक आरोपीला अमर रमेश खेडेकर (वय २८, रा. तुमसर, जि. भंडारा) यांनी दुचाकी दिली नाही. या कारणावरून आरोपी साहिल आणि त्याच्या तीन साथीदारांनी खेडकर यांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. खेडकर यांचा मित्र आणि आजूबाजूला झोपून असणारे धावल्याने आरोपी पळाले. खेडकर यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
----