नागपूर : वनसेवेत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ शनिवारी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त वनभवन येथे स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी.साईप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांनी मौन पाळून, तसेच स्मारकावर पुष्प वाहून श्रद्धांजली दिली. या प्रसंगी भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकारी, वनकर्मचारी उपस्थित होते. राज्यातील वन शहिदांच्या स्मृतीसाठी वनभवन या मुख्यालयी वन हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. येथे ही श्रद्धांजली वाहण्यात आली. १९३५ पासून आतापर्यंत राज्यात २८ वन कर्मचाऱ्यांना हौतात्म्य आले आहे. यात रोजंदारी वनमजूर, वाहन चालक, वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे. राजस्थानातील बिष्णोई समुदायातील ३६३ व्यक्तिंनी खेजरली गावातील खेजडी वृक्षांच्या संरक्षणासाठी सन १७३८ला दिलेल्या बलिदानानिमित्त ११ सप्टेबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
वनभवनात वन हुतात्म्यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST