शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी अडचणीमुळे त्रस्त
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाणीपुरवठा, कचरा संकलन, रस्ते, पथदिवे यासाेबतच परिवहन सेवासुध्दा अत्यावश्यक आहे. परंतु मनपा प्रशासन ज्या पध्दतीने परिवहन सेवेकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यावरून अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा स्पष्ट दिसत आहे. नागरिकांच्या सुविधापेक्षा मनपाला स्वत:च्या तिजोरीची चिंता लागली आहे. विकास कामे ठप्प आहेत. अथक प्रयत्नानंतर २२० दिवसांनी सुरू झालेली बससेवा ४० टक्के सुरू आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे शहरासह अन्य काही शहरात पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू आहे. सध्या शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना बसची सर्वाधिक गरज आहे.
परिवहन सेवेचे गणित समजून घेण्याची गरज आहे. ही सेवा कधीही नफ्यात नव्हती. नागरिकांना सुविधा व्हावी हा यामागील हेतू आहे. नागपूर मनपात आजवर जे आयुक्त आले त्यांना याची चांगल्याप्रकारे जाणीव होती. परंतु सध्या प्रशासनाची परिवहनाबाबत असलेली मानसिकता लक्षात घेता ही सेवाच ठप्प पडेल. सध्या बस क्रमबध्द पध्दतीने चालविण्याची गरज आहे. परंतु मनपाचे प्रमुख काही ऐकण्यास तयार नाही. मनपात कोविडमुळे आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे रडगाणे सुरू आहे.
मुंबईत बेस्टच्या ५ हजार बस संचालित करण्यासाठी २२०० कोटी, पुणे येथे २००० बस संचालनासाठी १२०० कोटींचे बजेट आहे. दुसरीकडे नागपुरात ४३७ बस संचालनासाठी १०६ कोटींचे बजेट आहे. दर महिन्याला मनपा तिजोरीतून ७ कोटी खर्च होत आहेत. तर तिकिटातून दर महिन्याला ५ कोटी जमा होतात.