व्यापार्यांची मागणी : व्यापार्यावरील हल्ल्याचा निषेध
नागपूर : इतवारी येथील एका व्यापार्यावर मंगळवारी रात्री छापरूनगर भागात काही गुन्हेगारांनी हल्ला केला. त्यांच्याकडील लाखो रुपयांची रोकड घेऊन गुंड फरार झाले. या घटनेने व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण असून व्यवसायासाठी आम्हाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी व्यापार्यांनी बुधवारी मस्कासाथ परिसरात झालेल्या निषेध सभेत केली. नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने आयोजित सभेत व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी घटनेची तीव्र शब्दात निंदा केली. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी व्यापार्यांवर होणार्या अन्यायाविरोधात रोष व्यक्त केला. असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रकाश गोयल यांनी घटनेची निंदा केली. किराणा व्यावसायिक भरतभाई ठक्कर यांनी सांगितले की, व्यापार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुन्हेगारांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी रात्री मस्कासाथ, किराणा ओळ, इतवारीसहित अन्य व्यावसायिक परिसरात गस्त घालावी. नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष महेंद्र कटारिया यांनीही व्यावसायिक परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली. नागपूर आॅईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण शर्मा यांनी इतवारी, मस्कासाथ या व्यावसायिक परिसरातील संबंधित पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी केली आणि घटनेचा निषेध केला. चंदन गोस्वामी यांनी सांगितले की, एक वर्षात इतवारी, मस्कासाथ या ठोक बाजारात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. भाजपा व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष आसिफ कलीवाला यांनी या घटनेच्या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचे व्यापार्यांना आवाहन केले. सभेत पुरुषोत्तम थावरानी, दिलीप फुलवानी, कल्पेश मेहता, ईश्वर ज्ञानानी, चंदू आमेसर, जवाहरलाल गुप्ता, हरीश किशनानी, पुरुषोत्तम फुलवानी, मोहनदास फुलवानी, रामचंद्र वन्सियानी, सलीम, मुकेश नाथानी, तुलसी खंडवानी यांच्यासह किराणा बाजारातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)