चार गंभीर : बोरीघिवारी शिवारातील घटनाकोदामेंढी : विजेचे खांब घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तीन कामगारांचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना मौदा तालुक्यातील तोंडली - वायगाव मार्गावरील बोरी (घिवारी) शिवारात शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. मृत तिन्ही कामगार कोदामेंढीचे असल्याने गुडीपाडव्याच्या दिवशी गावात शोककळा पसरली. विकास वसंता मोहनकर (२१), सुजीत कचरू सलामे (२५) आणि कार्तिक गेंदलाल वरखडे (२२) तिघेही रा. कोदामेंढी, ता. मौदा अशी मृत कामगारांची नावे असून, जखमींमध्ये राजकुमार बिरशा पंधरे (४०, रा. कोदामेंढी, ता. मौदा), धनराज पूरण गाडेकर (४७, रा. शिवाडौली, ता. मौदा), देवचंद अंकला चटवापाच (४५, रा. शिवाडौली, ता. मौदा) व अतुल तुळशीराम हटवार (२०, रा. कोदामेंढी, ता. मौदा) या चार कामगारांचा समावेश आहे. मौदा तालुक्यात विजेचे खांब बदलविण्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे कंत्राट रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे. यातील काही कामांचे कंत्राट जय बजरंग इलेक्ट्रिकल्स कंपनीने रुद्रानी कंपनीकडून घेतले आहे. हे सर्व कामगार या कंपनीकडे खांब उभारण्याचे काम करायचे. दरम्यान, वायगाव शिवारात खांब उभारण्याचे काम सुरू असल्याने या कामगारांनी एमएच- ४०/ए-२७४४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विजेच्या खांबासह इतर साहित्य टाकले आणि ते स्वत: ट्रॉलीमध्ये बसून कोदामेंढीहून तोंडली मार्गे वायगावला जाण्यास निघाले. हा ट्रॅक्टर कोदामेंढी येथील कृष्णा मसराम यांच्या मालकीचा आहे. माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी ट्रॉलीखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात विकास, सुजीत आणि कार्तिक या तिघांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी अतुलला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित तिघांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उत्तरीय तपासणी आटोपल्यानंतर सायंकाळी तिघांच्या पार्थिवावर कोदामेंढी येथील स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोदामेंढी येथे शोककळा पसरली होती. (वार्ताहर)रोडच्या उताराने केला घातया ट्रॉलीमध्ये एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला तीन असे एकूण सिमेंटचे सात खांब ठेवण्यात आले होते. सारंग मेश्राम हा ट्रॅक्टर चालवित होता. हा ट्रॅक्टर बोरी (घिवारी) शिवारात पोहोचताच ज्या बाजूला चार खांब ठेवण्यात आले होते, त्या बाजूने ट्रॉली उलटली. विशेष म्हणजे, या चार खांबांच्या बाजूने रोडला अधिक उतार होता. ट्रॉली उलटताच ट्रॅक्टर रोडवर आडवा झाला आणि सातही कामगार ट्रॉलीखाली दबल्या गेले. त्यात तिघांचा मृत्यू झाला.
ट्रॉली उलटून तीन कामगार ठार
By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST