नागपूर : देशातील कृषी क्षेत्राची आजची परिस्थिती लक्षात घेता नवीन जलसिंचन प्रकल्पांची अनेक ठिकाणी आवश्यकता आहे. परंतु यात भूमी अधिग्रहणाचा अडथळा येत आहे. जर जमीनच मिळाली नाही तर एकही नवा प्रकल्प उभारताच येऊ शकणार नाही असे मत केंद्रीय जलसंपदा व नदीविकास मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. बुधवारी त्या व्यक्तिगत कामासाठी उपराजधानीत आल्या असताना पत्रकारांशी त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर संवाद साधला.देशात सध्या भूमी अधिग्रहण विधेयकाबाबत विविध प्रकारच्या नकारात्मक बाबी पसरविण्यात येत आहेत. हे विधेयक देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारे आहे. या विधेयकातील काही नियम जर राज्य सरकारांना पटणारे नसतील तर त्यात बदल करण्याचा त्यांना अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे हे विधेयक असताना याला विरोध का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.काँग्रेसचे नेते कुठल्याही विषयाचा अभ्यास न करता केवळ द्वेष भावनेतून खोटे बोलतात. राहुल गांधी यांनी योग्य अभ्यास करून मगच बोलावे तसेच इतर काँग्रेस नेत्यांनादेखील तसेच करायला लावावे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. भारती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक मा.गो.वैद्य यांची या धावत्या दौऱ्यात भेट घेतली.(प्रतिनिधी)
-तर एकही नवा प्रकल्प होणार नाही
By admin | Updated: April 23, 2015 02:26 IST