योगेश पांडेनागपूर : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना तातडीने खोल्यांमध्ये सामान ठेवूनच गावी परतावे लागले. मात्र आता बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगळ्याच संकटात सापडले आहेत. अनेक घरमालक व खासगी वसतीगृहचालक चक्क भाड्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर भाड्यासाठी दबाव आणत आहेत. असे न केल्यास खोल्यांतून सामान घेऊन जा असे सांगितले जात आहे. नागपुरहून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये यामुळे तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नियमावलीत स्पष्ट उल्लेख असतानादेखील घरमालक मनमानी करुन भाडे मागण्याचा प्रकार करत असल्याचे चित्र आहे.देशात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयातर्फे विशेष नियमावली जारी करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या कालावधीत भाडेकरुंवर भाडे देण्यासाठी दबाव आणू नये व खोली रिकामी करण्यासाठी तगादा लावू नये असे यात स्पष्टपणे नमूद होते. नागपूर शहरात धरमपेठ, गांधीनगर, शिवाजीनगर, शंकरनगर, रामगर या भागात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी भाड्याने खोली घेऊन अथवा खाजगी वसतीगृहांमध्ये राहतात. उन्हाळी परीक्षांसाठी परत यायचे असल्याने व तातडीने रवाना व्हायचे असल्याने बहुतांश जणांनी आपले सामान खोलीवरच ठेवले. मात्र आता पूर्ण भाडे द्या अथवा पूर्ण सामान घेऊन जा असा तगादा घरमालकांनी लावला आहे.मोदी, प्रशासनाला सांगायला काय होते‘लोकमत’कडे यासंदर्भात काही विद्यार्थिनींनी आपली समस्या मांडली. शिवाजीनगर स्केटिंग मैदानाजवळच असलेल्या एका घरात काही विद्यार्थिनी भाड्याने राहतात. या सर्व विद्यार्थिनी आपल्या गावी गेल्या असताना त्यांच्या घरमालकाने भाडे देण्यासाठी दबाव टाकणे सुरू केले आहे. बहुतांश विद्यार्थिनींनी अर्धे भाडेदेखील दिले. मात्र पूर्ण भाडे द्या अन्यथा लगेच खोली रिकामी करा अशी भूमिका घरमालकाने घेतली आहे. यासंदर्भात त्यांना पालकांनी विचारणा केली असता पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी किंवा प्रशासनाला नियम बनवायला काय होते. ते थोडी इथे येऊन परिस्थिती पाहणार आहेत. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण भाडे द्या’, असे उत्तर त्यांना घरमालकांकडून देण्यात आले. आम्ही घरमालकाला अर्धे भाडे देण्याची तयारी दाखविली आहे. आमचे केवळ सामानच तिथे आहे. परीक्षांसाठी आम्हाला परत यायचेच आहे. अशा स्थितीत आम्ही काय करावे असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे.भाडे द्या अथवा सामान घेऊन जायासंदर्भात संबंधित घरमालक विजयराव देवगडे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता जर कुणी आमच्या खोल्यांमध्ये राहत असेल तर त्यांनी भाडे देणे अपेक्षित आहे. त्यांनी भाडे द्यावे अथवा सामान घेऊन जावे, असे त्यांनी स्पष्ट केले.काय म्हणतात नियमलॉकडाऊनच्या कालावधीत घरमालकांनी भाडेकरुन भाडे देण्यासाठी दबाव टाकू नये. शिवाय विद्यार्थ्यांना खोली रिकामी करण्यासाठी सांगू नये. जर नियमांचा भंग झाला संबंधित राज्य शासनाच्या यंत्रणेने व पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे