तरन्नुमची हतबलता : पण, कठोर परिश्रमाने दहावीत मिळवले ९३ टक्के वीरेंद्रकुमार जोगी नागपूरघवघवीत यश मिळाले की आनंद होतो अन् मग तो आनंद व्यक्त करण्यासाठी लोक मिठाई वाटतात. मिठाई जणू आनंदाचा पर्यायच झाली आहे. परंतु हाय रे प्रारब्ध... कठोर परिश्रमाच्या बळावर यशाची तार छेडणाऱ्या ‘तरन्नुम’कडे साधी मिठाई घ्यायलाही पैसे नव्हते. दहावीत ९३ टक्के गुण मिळाल्याची वार्ता तिच्या वस्तीत पोहोचली अन् जो-तो तिला मिठाई मागायला लागला. दोनवेळच्या अन्नाची भ्रांत तिथे मिठाई कुठून आणणार? अखेर तिने घरातल्या एक मळकट डब्यातून दोेन चमचे साखर काढली अन् शुभेच्छा द्यायला आलेल्यांच्या हातावर ठेवली. ही कहाणी आहे जगदीशनगरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या तरन्नुम सलीम अन्सारीची. शिक्षकांनीच केला शिक्षणाचा खर्चनागपूर :काटोल रोड फ्रे न्डस् कॉलनी येथील पंडित नेहरू हायस्कूलच्या तरन्नुम सलीम अन्सारी हिने दहावीत ९३ टक्के गुण मिळविले आहे. वडील मिळेल ती मजुरी करणारे तर आई घरोघरी धुणीभांडी करून हातभार लावणारी, घर म्हणजे जगदीशनगर झोपडपट्टीतील एक भाड्याची खोली. घरात व घराबाहेर स्वत:च्या अस्तित्वाचा नेहमीचा संघर्ष, घरात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी. तिने हिंमत हरली नाही अन् यशाला खेचून आणले आपल्या दारात. तरन्नुमचे वडील मेकॅनिक असले तरी स्वत:चे गॅरेज नाही. घरातील सर्व सदस्यांची भूक भागविण्यासाठी आईलाही कष्ट उपसावे लागतात. तरन्नुमही सुटीच्या दिवशी लग्न व इतर प्रसंगात हातावर मेहंदी काढून देत स्वत:चा खर्च भागविते. लहानपणापासूनच आपल्या बुद्धीची चमक दाखविणाऱ्या तरन्नुमला शिक्षकांची मदत मिळत राहिली. आठव्या वर्गात असताना नाव काढायला आलेल्या तिच्या पालकांचे मन शिक्षकांनी वळविले. आठव्या वर्गापासून तिच्या शिक्षणाचा खर्च शाळेतील शिक्षक करीत आहेत. पंडित नेहरू शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भोयर, बाळा आगलावे व उल्हास पुरकाम यांचे मार्गदर्शन व मदत तिला मिळाली, राजेश दानव यांनी कोणत्याही अपेक्षेविना तिच्या उजळणीची जबाबदारी घेत तिचा अभ्यास करून घेतला. तिच्या या यशात शिक्षकांचा वाटा मोठा असल्याचे ती सांगते. (प्रतिनिधी)आता ध्यास एनडीएचा...एका खोलीचे घर असल्याने अभ्यास करताना मोठी अडचण होते. त्यामुळे अभ्यास करायचा असेल तर मैत्रिणींचे घर गाठावे लागत होते. कधी कधी घरात राहणेदेखील कठीण होत असे, अशी परिस्थिती असायची, तीन बहीण-भावात सर्वात मोठी असलेली तरन्नुम आपल्या भावंडांचादेखील अभ्यास घेते. ही पहिलीच पायरी आहे. आता एनडीए पास करून देशसेवा करीत आपल्या कुटुंबाला स्थैर्य मिळवून द्यायचे आहे, असेही तिने सांगितले.
मिठाईलाही पैसे नसल्याने वाटली साखर
By admin | Updated: June 10, 2015 02:57 IST