ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : ‘महागॅम्स’ कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन नागपूर : राज्यभरातील औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणारी राख ही समस्या बनली आहे. तिची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करावा लागत आहे. मात्र आजपर्यंत आपण ज्या राखेकडे समस्या म्हणून पाहत होतो, आज तीच राख हजारो नवीन रोजगार निर्मितीचे साधन बनणार आहे. त्यापासून वेगवेगळे उद्योग उभे राहणार आहे. त्यासाठी राज्यभरातील वीज केंद्र परिसरातील राख साठवण तलावाजवळ औद्योगिक वसाहत उभारली जाणार असल्याची माहिती राज्याचे नवीन व नविकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या ‘महागॅम्स’ या कंपनीच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाचे बावनकुळे यांच्या हस्ते शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. बावनकुळे पुढे म्हणाले, यातून सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे. शिवाय महानिर्मितीची राख वाहतुकीवर होणाऱ्या २००० कोटींच्या खर्चाची बचत होईल. सोबतच डी-प्लस दर्जाच्या औद्योगिक क्लस्टरमधील उद्योगांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जाणार असून, त्याचा उद्योगांना फायदा मिळणार आहे. राज्यातील राखेचा १०० टक्के वापर करण्याकरिता लवकरच मुंबई येथे गुंतवणूकदारांची एक परिषद आयोजित केली जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राखेच्या या उपयोगासाठी वेगवेगळ्या दहा संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यात नागपुरातील नीरीसह अकोला महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, म्हाडा, प्रियदर्शिनी संस्था, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, रायसोनी संस्था, दिल्ली येथील रायझिंग जपान इन्फ्रा न्यू कंपनी, अभी इंजिनियरिंग कॉलेज व बडवे इंजिनियरिंग या संस्थांचा समावेश आहे. यावेळी पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल सोले होते. तर मंचावर आ. कृष्णा खोपडे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महागॅम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, महागॅम्सचे संचालक कैलाश चिरुटकर, सुधीर पालीवाल, वीज मंडळाचे निवृत्त तांत्रिक संचालक प्रभाकर कुकडे, अनिल पालमवार व गिरधर मंत्री प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन मिलिंद राहाटगावकर यांनी केले तर महागॅम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण माथुरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मान्यवरांचा सत्कार ‘महागॅम्स’ च्या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून राखेच्या उपयोगीतेसाठी उल्लेखनीय काम करणारे देवराव कापडे व डॉ. भद्रेश भट यांच्यासह राख धोरणाचा मसुदा व राख व्यवस्थापन कंपनी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘महागॅम्स’ चे संचालक सुधीर पालीवाल यांचा ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंत्राटी कामगारांना घरे मिळणार अलीकडे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने उत्सर्जन धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार पर्यावरणपूरक वीज उत्पादनासह राखेवर आधारित विविध उद्योगांना प्रोत्साहन देणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, राखेवर संशोधन करणे शिवाय याबाबतची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवून राखेचा महत्तम वापर शेती, घरांसाठी, रस्ते, पूल, खाणींमधील पोकळी भरण्यासाठी उपयोग करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, यातून महानिर्मितीची फार मोठी आर्थिक बचत होणार आहे. राखेचा वापर करून कंत्राटी कामगारांना महानिर्मितीच्या सर्व वीज केंद्राजवळील पडित जमिनीवर माफक दरात घरे बांधून दिली जाणार असल्याचे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात राख ही समस्या न राहता ती समाजोपयोगी संपत्ती बनणार आहे.
राज्यात राखेवर आधारित औद्योगिक वसाहत उभारणार
By admin | Updated: November 19, 2016 02:51 IST