काटोल : काटोलमधील दोन शेतकऱ्यांनी पांदण रस्ता मोकळा करून वहिवाट सुरळीत करून द्या अन्यथा शेतात जाण्याकरिता हेलिकॉप्टरची व्यवस्था करून द्या, अशा मागणीचे निवेदन सोमवारी उपविभागीय व तहसील कार्यालयात सादर केले. पेठबुधवार, काटोल येथील शेतकरी सचिन बाबारावजी शेंद्रे यांची शेती मौजा पेठबुधवार येथे आहे. त्यांच्या शेतीचा शेत स. ४५/१ असा आहे. याच भागात अक्षय किशोर इफर यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतीसुद्धा आहेत. या शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी जो रस्ता शासनाने २००० साली उपलब्ध करून दिला त्यावर किरण महाजन नामक शेतकऱ्याने अतिक्रमण करून त्यांचा रस्ता अडविला. यामुळे वहिवाटीचा गंभीर प्रश्न या शिवारात निर्माण झाल्याचा आरोप या दोन्ही शेतकऱ्यांनी केला आहे. पूर्वी जाम नदीच्या पात्रातून या भागातील शेतकरी वहिवाट करून शेतात जात होते. परंतु आता या पात्राचे खोलीकरण झाल्यामुळे हा रस्ता वहिवाट करण्याजोगा राहिलेला नाही. तक्रारकर्त्यांनी नमूद केल्याप्रमाणे २००० साली शासनाच्या वतीने शेतीतील जागा रस्त्याकरिता खरेदी केली असून, या जमिनीचा आर्थिक मोबदलासुद्धा शेतकऱ्याला दिला आहे. रस्त्याच्या वहिवाटीचा मार्ग मोकळा असल्याची माहिती असल्यानेच वरील दोन्ही तक्रारदार शेतकऱ्यांनी आपले व्यवसाय शेतात थाटले. याकरिता त्यांनी बँकेचे कर्जसुद्धा घेतले आहे. परंतु जेमतेम व्यवसाय सुरू झाला आणि वहिवाटीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे याचा फटका या दोन्ही शेतकऱ्यांना बसतो आहे.
- तर शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST