नागपूर : गजबजलेल्या वस्तीत दिवसाढवळ्या एका इसमाची चाकू भोसकून हत्या करणार्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली सात वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना यशोधरानगर पोलिसांच्या हद्दीत घडली होती. पीर मोहम्मद ऊर्फ मुन्ना मोहम्मद सिद्धिकी अन्सारी (३0) असे आरोपीचे नाव असून, तो इंदिरामातानगर येथील रहिवासी आहे. मृताचे नाव चंद्रशेखर आहे. व्यवसायाने ऑटो चालक असलेला मुन्ना व चंद्रशेखरमध्ये घटनेच्या दिवशी जोरदार भांडण झाले होते. दोघांनीही एकमेकांना चांगले बदडले होते. यानंतर चंद्रशेखरला त्याची पत्नी योगिताने समजावून घरी आणले होते. घरी आल्यावर चंद्रशेखरने फाटलेले शर्ट बदलविले. तो अंगणात उभा असताना मुन्ना त्याच्या घरापुढून बडबडत गेला. यामुळे चंद्रशेखर त्याचा पाठलाग करायला लागला. शीतलामाता मंदिराजवळ दोघांमध्ये पुन्हा हातापायी झाली. आरोपीने दोन चाकू सोबत आणले होते. चंद्रशेखरला जमिनीवर लोळविल्यानंतर मुन्ना त्याच्या अंगावर बसला व दोन हातात दोन चाकू घेऊन चंद्रशेखरला ठिकठिकाणी भोसकले. चंद्रशेखर निपचित पडल्यावर मुन्ना निघून गेला. परिसरातील नागरिक हा सर्व प्रकार पाहात होते. काही वेळानंतर चंद्रशेखरचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी ४.३0 च्या सुमारास घडली होती. मृताची पत्नी योगिता, राजकुमार बागडे, सुषमा भगत व टिकेश शाहू हे प्रत्यक्षदश्री साक्षीदार होते. ३0 डिसेंबर २0१0 रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपी मुन्नाला भादंविच्या कलम ३0२ अंतर्गत दोषी ठरवून आजन्म कारावास व ५00 रुपये दंड आणि दंड भरला नाही तर तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयात आरोपीकडून अँड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली. मुन्नाचा हत्या करण्याचा उद्देश नव्हता. त्याने चंद्रशेखरच्या र्ममस्थळावर घाव घातले नाही. यामुळे त्याला कलम ३0२ अंतर्गत दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. अतिरिक्त सरकारी वकील संगीता जाचक यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. प्रकरणातील तथ्य पडताळल्यानंतर न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व चंद्रकांत भडंग यांनी चंद्रशेखरही मुन्नासोबत भांडण करण्यास उतावीळ होता, असे आढळून येत असल्याचा निष्कर्ष काढला. तसेच विविध बाबी लक्षात घेता आरोपी मुन्नाला भादंविच्या कलम ३0२(हत्या)ऐवजी कलम ३0४-२(सदोष मनुष्यवध)अंतर्गत दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड भरला नाही तर तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
सात वर्षे सश्रम कारावास
By admin | Updated: May 29, 2014 03:24 IST