‘तिखट’ दोन वर्षांत ३० टक्के दरवाढ : मिरचीची आवक कमी
नागपूर : पावसाच्या अनिश्चिततेमुळे विदर्भचे नव्हे तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाल मिरचीचे पीक कमी होत असल्याने भाव वधारले आहेत. परिणामी स्वयंपाकघरात दैनंदिन उपयोगात येणारे तिखटाचे भाव ३० टक्क्यांनी वाढल्याने ते पुन्हा ‘तिखट’ झाले आहे. घरच्या घरी लाल मिरचीपासून तिखट तयार करण्याचे दिवस आता नाहीत. नामांकित कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने खरेदीकडे गृहिणींचा कल वाढला आहे. बाजारात तिखटाचे भाव प्रति किलो २०० रुपयांवर आहेत. दोन वर्षांआधी भाव १४० ते १५० रुपयादरम्यान होते. जास्त लालसर आणि तिखटपणा असलेले भिवापुरी मिरचीचे तिखट खास दर्जानुसार प्रति किलो २५० रुपयांवर गेले आहे. वाघमारे मसाले कंपनीचे संचालक प्रकाश वाघमारे यांनी सांगितले की, कळमना बाजारात मिरचीचे प्रति किलो दर दर्जानुसार ७० ते ८५ रुपयादरम्यान आहेत. याशिवाय कर्नाटक येथील बेडगी मिरची १५० रुपये किलो विकली जाते. मिरचीच्या दर्जानुसार तिखट तयार होते. कंपनी गुणवत्तेवर भर देत असल्याने वाघमारे तिखटाला बाजारात मागणी आहे. भिवापुरी लाल मिरचीला सर्वत्र मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. कळमन्यातून मिरचीची निर्यात विदर्भातील मोठे निर्यातदार प्रकाश वाधवानी यांनी सांगितले की, कळमना लाल मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. दर सोमवारी लिलाव होतो. यादिवशी ५० ते ६० हजार पोत्याची (प्रति पोते ४० कि़) आवक असते. मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक आवक असते. १५ दिवसांआधी ५० हजार पोते यायचे. सध्या सिझन नसल्याने आवक १० ते १२ हजार पोते आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर ही देशातील मोठी बाजारपेठ ५ जूननंतर सुरू झाल्यानंतर आवक वाढेल. सर्व माल स्टोरेजमधील राहील. गुंटूरमध्ये दरवर्षी ६० ते ६५ लाख पोत्यांचा स्टॉक असतो. पण यंदा उत्पादन कमी झाल्याने स्टॉक ४५ ते ४७ लाख पोत्यांपर्यंत कमी झाला आहे. प्रति किलो दर ६५ ते ८० रुपयादरम्यान आहेत. जगात सर्वात मोठा निर्यातदार चीन देश सध्या मिरचीची आयात करीत आहे. विदर्भातून युरोप, अमेरिका, मध्यपूर्व देश, मलेशिया, सिंगापूर देशांमध्ये लाल मिरचीची निर्यात होत असल्याचे वाधवानी म्हणाले. काही कारणांमुळे गेल्या १५ दिवसांपासून संयुक्त अमिरात देशांमध्ये निर्यात बंद आहे. बोलणी सुरू आहे. निर्यात सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)