मनपा : स्थायी समितीचा निर्णय नागपूर : महापालिका प्रशासनाने दिलेला २०० बसेसची खरेदी व वाहतुकीबाबतचा १४४.२३ कोटींचा प्रस्ताव तूर्त थांबविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.केंद्र सरकारने जेएनएनयूआरएम योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाही या प्रस्तावानुसार २० वातानुकूलित तर १८० साध्या बसेस खरेदी करावयाच्या आहेत. यात केंद्र व राज्य सरकारकडून किती निधी मिळणार या संदर्भात स्पष्ट केलेले नाही. तसेच मनपाच्या परिवहन समितीनेसुद्धा या प्रस्तावाला अद्याप मंजुरी दिली नसल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिली. प्रस्तावात २०० बसेसची किंमत ९१ कोटी गृहीत धरण्यात आली आहे. तसेच सोमलवाडा, कामठी, पारडी, वाडी,हिंगणा, नागपूर-१ व नागपूर-२ असे ७ डेपो व टर्मिनल प्रस्तावित आहेत. डेपो निर्माण व आवश्यक सुविधा यावर ४५.६० कोटी, प्रवासी निवाऱ्यावर ४.५० कोटी, जीपीएस व अन्य सुविधांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. योजना बंद केली असली तरी केंद्र सरकारकडून मदत मिळेल अशी मनपाला अपेक्षा आहे. सध्या मनपाच्या २४० व व्हीएनआयएल च्या २३० बसेस आहेत. परंतु यातील जेमतेम १५० बसेस शहरात धावत आहेत. (प्रतिनिधी)
२०० बसेसची खरेदी तूर्त रोखली
By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST