नागपूर : मनपातर्फे दुकानदारांचे भरमसाट भाडे वाढविण्यावर आणि नागपूर शहराबाहेरील एमएसएमईना विविध कारणांनी नोटिसा बजावून उद्योग बंद करण्याचे अधिकाऱ्यांचे कारस्थान राज्य शासनाने बंद पाडावे आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर प्राधान्य द्यावे, असे अशी मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी राज्य शासनाचे वाहतूक व सांसदीय मंत्री अनिल परब यांच्याकडे नागपुरात केली.
अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातील प्रतिनिधी मंडळाने परब यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन दिले. अग्रवाल म्हणाले, मनपातर्फे दुकानांच्या भाडेपट्टीत एकतर्फी वाढ करण्यात आल्याने लहान व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील एमएसएमई युनिट अनधिकृत सांगून बंद करण्याच्या नोटीस त्यांना बजावण्यात येत आहेत. त्यामुळे लघु उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागपूर महानगर क्षेत्राकरिता २०१८ मध्ये अधिसूचित विकास नियंत्रण विनियमाच्या (डीसीआर) पूर्वव्यापी कार्यान्वयनावर सर्व नगर परिषदा आणि भाड्यात एकतर्फी वाढीवर अग्रवाल यांनी विरोध दर्शविला. प्रतिनिधी मंडळाच्या समस्या ऐकून परब यांनी सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रतिनिधी मंडळात संजय के अग्रवाल उपस्थित होते.