नागपूर : महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या नव्या धोरणांतर्गत सुरू असलेल्या मोहिमेत काटोल विभागातील सावरगाव आणि नरखेड येथील ९० शेतकऱ्यांनी १६ लाख ५८ हजार रुपयाच्या कृषिपंपाच्या थकबाकीचा भरणा केला.
सावरगाव येथे झालेल्या मेळाव्यात महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी अध्यक्षस्थानी होते. मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता राजेंद्रकुमार मलासने उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कृषिपंपाच्या वीज देयकापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने काढलेल्या योजनेत शेतकरी सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील १३ हजार ७८७ शेतकऱ्यांनी सुमारे १२ कोटी रुपयांचा भरणा केला, अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती देवकाबाई बोडखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे उपस्थित होते. थकबाकीची रक्कम एकत्रित भरणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
नरखेड येथील मेळाव्यात पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, माजी सभापती वसंत चांडक, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश रेवतकर उपस्थित होते. तिनखेडा ग्रामपंचायतने सौर कृषी ऊर्जा प्रकल्पासाठी ३५ एकर जागा देण्याची तयारी दाखविली.
...
आता ग्रामपंचायतींना मिळणार वसुलीचा वाटा
थकबाकीचा निधी वसूल करण्यात स्थानिक ग्रामपंचायतींनी सहकार्य केल्यास त्यांनाही प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे. थकलेली वसुली लवकर होण्यासाठी महावितरण कंपनीने ही योजना आखली आहे. या योजनेत वसूल होणारा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात विजेचे जाळे मजबूत करण्यावर खर्च करण्याचे महावितरणचे नियोजन आहे.
...