ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 02 - राज्यात महापालिका व जिल्हापरिषदांची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये (ईव्हीएम) गडबड केल्याचा आरोप करीत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. गुरुवारी नागपुरातही ईव्हीएम हटाव,संविधान बचाव अशा घोषणा देत ‘सर्व दलीय प्रजातंत्र बचाओ’समितीच्या वतीने चिटणवीस पार्क ते संविधान चौक असा मोर्चा काढून मतपत्रिकाव्दारेच फेरमतदान घेण्याची मागणी करण्यात आली.
ईव्हीएममध्ये सेटिंग करून भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याचा आरोप काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी केला आहे. ईव्हीएममध्ये घोळ केल्याने याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी. बहुसदस्यीय प्रभाग पध्दती बंद करण्यात यावी. मतदार यादीतील घोळ लक्षात घेता याद्यांचे शुद्धीकरण करण्यात यावे, झालेले मतदान व मतमोजणीच्या वेळची मते यात मोठ्या प्रमाणात फरक असल्याने फेरमतदान घेण्यात यावे. अशी आग्रही मागणी करण्यात आली. मोर्चा°f पराभूत उमेदवार व पक्षाचे कार्यकर्ते हजारोच्या संख्यने सहभागी झाले होते.
मोर्चात माजीमंत्री अनिस अहमद, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसैन, विशाल मुत्तेमवार, नगरसेवक बंटी शेळके, रमन ठवकर,सुरेश जग्याशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे, बंडू तळवेकर, किशोर पराते, चिंटू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ईश्वर बाळबुधे, राजदचे कुमार पंचबुधे, तसेच असलम मुल्ला, किशोर डोरले, विकास खोब्रागडे, मीना तिडके, शेख अजीज शेख अजीज, तौसिक अहमद, मिलींद सोनटक्के, रवी गाडगे पाटील, वंदना इंगोले, जयश्री जांभुळे आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मागण्याचे निवेदन सादर करून चर्चा केली.