लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट झाली आहे. नामनिर्देशनपत्र सादर करताना उमेदवारांसह चार लोकांनाच उपस्थित राहता येईल. प्रचार करताना गर्दी न करता कोविड सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करावा लागणार. प्रचारात पाचजणांनाच परवानगी आहे, तर राजकीय सभा किंवा बैठकीसाठी ५० लोकांना उपस्थित राहता येईल.
जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात गुरुवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे यांनी उपरोक्त कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते.
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जिल्ह्यात जाहीर झाला आहे. यासाठी राजकीय पक्षांनी प्रचार करताना आदर्श आचारसंहिता व कोविड सुरक्षा उपायांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी केले.
१११५ मतदान केंद्रांवर ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने सनियंत्रण अधिकाऱ्यांची बैठकही यावेळी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील उद्या होणाऱ्या सुनावणीनंतर पुढील दिशा स्पष्ट होणार असली तरी निवडणुकीसाठी मिळणारा कमी कालावधी बघता संनियंत्रण अधिकाऱ्यांनी दिलेली कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.