डब्बा ट्रेडिंगमध्ये धक्कादायक खुलासे : पोलिसांचे न्यायालयात शपथपत्र नरेश डोंगरे नागपूर डब्बा ट्रेडिंगच्या नावाखाली एकेका डब्बा व्यापाऱ्यांनी अब्जोबधींची सट्टेबाजी केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तशा अर्थाचे उच्च न्यायालयात मंगळवारी शपथपत्र दाखल केले. त्यात ही माहिती नमूद असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. डब्बा सट्टेबाजीच्या आड समांतर शेअर मार्केट सुरू करून देशविदेशातील हजारो व्यापाऱ्यांना अब्जोवधींचा फटका देणाऱ्या नागपुरातील एल-७ समूहाचा सर्वेसर्वा रवी अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांचा गोरखंधदा १२ मे २०१६ ला गुन्हेशाखेने उघडकीस आणला. त्याच्या आणि साथीदारांच्या नागपुरातील निवास आणि कार्यालयात धाडी घातल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील कार्यालयातही धाड घातली. तेथून जप्त करण्यात आलेल्या कॉम्प्युटर, हार्डडिस्कची तज्ज्ञांकडून तपासणी केली. यात आढळलेल्या नोंदीचा अभ्यास करून आरोपींशी संबंधित सनदी लेखापाल (सीए) तसेच खासगी सनदी लेखापालांकडून आरोपींच्या व्यवहाराची तपासणी करवून घेतली. त्याचा आता अहवाल पोलिसांकडे आला असून तो पाहून खुद्द पोलीस अधिकारीही चक्रावल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, रवी अग्रवालचा या गोरखधंद्यातील राईट हॅण्ड समजला जाणारा कन्नी थावरानी याची एकट्याची २०१२ ते २०१६ या कालावधीतील उलाढाल १ लाख काही हजार कोटी रुपयांची असल्याची माहिती आहे. पोलिसांनी शपथपत्रात तसे नमूद केल्याचीही खास सूत्रांची माहिती आहे. कन्नीची एकूणच आर्थिक स्थिती बघता तो एवढी उलाढाल करू शकत नाही. रवी अग्रवालनेच ती करवून घेतली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. विशेष म्हणजे, या गोरखधंद्यात गुंतलेल्या कन्नीची एकूणच उलाढाल पोलिसांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. या उलाढालीतून बक्कळ रक्कम कमविणाऱ्या कन्नीने शासनाचा मात्र २० ते २५ कोटींचा कर (सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स) बुडविल्याची माहिती आहे. दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, सिमेंट, लोखंड सारख्या साहित्याचेही दर वाढवणे, कमी करण्याचे प्रकार डब्बा व्यापारी करीत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा फटका बसत होता. अनेक झाले बर्बाद डब्बा व्यापारात गुंतलेली काही निवडक मंडळी या गोरखधंद्यातून अब्जोपती झाली. आरोपी रवी अग्रवालने नागपूर, मुंबईच नव्हे तर दुबई, सिंगापुरातही डब्ब्यातून आपले साम्राज्य निर्माण केले. दुसरीकडे अनेक जण यात अक्षरश: बर्बाद झाले. डब्ब्याच्या नादी लागलेल्या अनेकांचा व्यापार बुडाला. अनेक कोट्यधीश रस्त्यावर आले तर दिनेश गोखलानी सारख्याने आत्महत्या केली.