लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याचे वाॅर सुरू झालेलं आहे. ऑपरेशन सिंदुरच्या वेळी आपल्या पंतप्रधानांनी सिंधु जल करार मागे घेण्याचा निर्णय घेताच पाकिस्तान जगभरात मदत मागू लागला. इतके त्या पाण्याचे महत्त्व आहे. पाण्यासाठी आता देशांदेशांत किंवा राज्या-राज्यांमध्येच नव्हे तर जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये वाॅर सुरू झाले आहेत. नाशिक, नगर व मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये असे वाॅर पाहायला मिळतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर होय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धरमपेठ येथे विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. आमदार डॉ. परिणय फुके,प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अतुल वैद्य, वनामतीच्या संचालक डॉ. वसुमनी पंत, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक राजेश सोनटक्के, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, राष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरो नागपूरचे संचालक डॉ. नितीन पाटील, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगे, प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी एक टक्के पाण्यावर संपूर्ण जग व जीवन चाललेल आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मूळ कारणच पाणी होते. सिंचनाच्या अपुऱ्या सोयीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. आता सिंचनाची बरीच कामे झाली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चांगले शास्त्रोक्त परिणाम दिसून येत आहेत. ज्या गावात जलयुक्त शिवारची कामे झाली त्या गावातील पाण्याची पातळी वर आली असून दुष्काळाचा धोका कमी झाला आहे.
नदी-नाले ओढे प्रदूषित झाले आहेत. यात १० टक्के वाटा उद्योगांचा असला तरी ९० टक्के वाटा आपल्या सर्वांचा आहे. याचा परिणाम शेतीसह सर्वांवरच होत आहे. पाण्याचा पुर्नवापर आणि जलधारण ही काळाची गरज आहे. ते जाणीवपूर्वक केले नाही तर पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले.
वैनगंगा-नळगंगा सह पाच नदीजोड प्रकल्पवैनगंगा-नळगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे चित्र बदलवणारा ठरणार आहे. यासोबतच राज्य सरकारने पाच नवीन नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहे. तसेच तापी जलपुनर्भरण योजनेबाबत मध्यप्रदेश सरकारसोबत करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे २० ते २२ टिएमसी पाणी अमरावती विभागातील जिल्ह्यांना मिळणार आहे, या प्रकल्पातून महाराष्ट्र जल स्वयंपूर्ण कसा होईल, याचा संपूर्ण रोडमॅपच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितला.
जलदूत निर्माण करणार - कुलगुरू डाॅ. खोडेपाण्याच्या योग्य वापराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून जलदूत निर्माण करणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दिली.