नागपूर : मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवेचा अनुशेष दूर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने परिचारिकांच्या नियुक्त करण्यात येत आहे. परंतु परिचारिकांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ४० टक्के परिचारिकांची बदली पुणे, मुंबईला करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय संशयाच्या भोवर्यात अडकले असून या बदल्यांमध्ये अर्थकारण दडल्याची चर्चा आहे. कोणतेही रु ग्णालय म्हटले की, रु ग्णांच्या सेवा-शुश्रूषेची महत्त्वपूर्ण जबाबदारी तेथील परिचारिकांवर असते. त्यात शासकीय रुग्णालय असलेल्या मेयो आणि मेडिकलमध्ये रुग्णांची संख्या पाहता परिचारिकांची संख्या तोकडी आहे. यामुळे रुग्णांची सेवा-शुश्रूषा करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याचे नेहमीचे दृश्य आहे. भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांनुसार तीन रु ग्णांच्या मागे एक परिचारिका असे प्रमाण आवश्यक आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयात ४० रुग्णांमागे एक परिचारिका असे प्रमाण आहे. यासंदर्भात नर्सेस असोसिएशनने वेळोवेळी आंदोलन केले, संप पुकारले. रुग्णालय प्रशासनानेही याची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहचविली. अखेर मागील वर्षी पुढील तीन वर्षांत राज्यात चार हजाराच्यावर पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या वर्षी सुपर स्पेशालिटीमध्ये ५०, मेयोमध्ये ७० तर मेडिकलमध्ये १५० वर परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली. परिचारिकांना नियुक्तपत्र मिळाल्यानंतर त्या रुजू झाल्या. परंतु १५ दिवसांतच यातील ४० टक्के परिचारिकांच्या बदल्यांचे डीएमईआरचे आदेश धडकले. आठ महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला असताना आता याच प्रकाराची पुनरावृत्ती होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन नोकरीत रु जू झाल्यानंतर किमान सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो. हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करता येत नाही, असा नियम आहे. या नियमाला धाब्यावर बसवून या परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमागे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
परिचारिकांच्या बदल्यांमध्ये दडलेय अर्थकारण!
By admin | Updated: May 12, 2014 01:06 IST