लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास टप्पा दोन- मार्केट एक येथील चटई क्षेत्र (एफएसआय) वाटपप्रकरणी आठ दिवसात उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
आ. महेश शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडत एफएसआय वाटपात बाजार समितीचे अधिकारी व संचालक मंडळ दोषी असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४६६ गाळेधारकांना एफएसआयचे वाटप केले आहे. अशा या गाळेधारकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याची नोटीस सर्वांना पाठविण्यात आलेली आहे. याप्रकरणी न्यायालयात आठ दिवसांच्या आत विभागाकडून शपथपत्र दाखल केले जाईल आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
याप्रकरणी सीनियर कौन्सिल नेमून सर्व माहिती न्यायालयाला दिली जाईल. याप्रकरणी अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.