- धूपबत्ती, कागदी पिशव्या, हर्बल गोवरी आदी गृहोद्योगातून बचत गटांची भरारी
विजय नागपूरे
कळमेश्वर : लॉकडाऊनंतर देशातील अर्थवस्था कोडमडली. अनेकांचा रोजगार हिरावला गेला. बिघडलेली घडी विस्कळीत करण्यासाठी पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. मात्र कळमेश्वर तालुक्यातील मायमाऊलींनी ग्रामीण अर्थव्यस्थेला बळकटी देण्यासाठी सहा वर्षापासूनच गृहउद्योगाची चळवळ गावागावात उभी करण्यासाठी सुरुवात केली आहे. याला आता व्यापक स्वरुप येऊ लागले आहे.
तालुक्यात गत सहा वर्षात ८४७ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. त्यांना उमेद अभियानाअंतर्गत आतापर्यंत २० कोटी १६ लाख ७० हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या कर्जातून महिला बचत गटांनी रेडीमेड शर्ट, धूपबत्ती, कागदी पिशव्या, हर्बल गोवरी, एलईडी सिरीज सारख्या गृहोद्योगातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न चालविला आहे.
ग्रामीण दारिद्र्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे. दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी ग्रामीण गरिबांना एकत्र आणून त्यांच्या सक्षम संस्था उभारणे, सदर संस्थामार्फत गरिबांना वित्तीय सेवा पुरविणे, गरिबांची व त्यांच्या संस्थांचे क्षमता वृद्धी व कौशल्यवृद्धी करणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी मदत करणे, हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा उद्देश तालुक्यातील बचत गटांच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेतला असता यशस्वी होताना दिसत आहे.
तालुक्यात ८४७ स्वयंसहायता गटामध्ये ८७६५ कुटुंबे समाविष्ट झाली आहेत. बचत गटांच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या वस्तु प्रदर्शनी तथा आठवडी बाजारातून विकल्या जातात.
असे झाले कर्जवाटप
वर्ष- २०१५-१६
बचत गट- ८४
कर्ज वाटप - १ कोटी १० लाख ३० हजार
-
वर्ष- २०१६-१७
बचत गट- १७७
कर्ज वाटप : १ कोटी ९८ लाख ७० हजार
--
वर्ष - २०१७-१८
बचत गट - १२८
कर्ज वाटप - २ कोटी ३० लाख ३० हजार
--
वर्ष - २०१८-१९
बचत गट- १४२
कर्ज वाटप - २ काेटी ९३ लाख ९० हजार
----
वर्ष - २०१९-२०
बचत गट - २६९
कर्ज वाटप - ५ काटो २९ लाख १० हजार
----
वर्ष - २०२०-२१
बचत गट - २०९
कर्ज वाटप - ६ कोटी ५४ लाख ४० हजार
बचत गट - ३५३
कर्जासाठी प्रस्ताव बँकेत सादर : १० कोटी ४ लाख ९० हजार
---
तालुक्यातील काही प्रमुख महिला बचत गट व त्यांनी उभारलेला उद्योग
१) सावित्रीबाई फुले महिला बचत गट, लिंगा
उद्योग - मसाले पापड
२) गुलमोहर महिला बचत गट, लाढई
उद्योग- धूप अगरबत्ती
३) एकता महिला बचत गट, गोंडखैरी
उद्योग- हर्बल गोवरी
४) प्रगती महिला बचत गट, उबगी
उद्योग- जनरल स्टोअर्स
५) स्वामिनी महिला बचत गट, खापरी
उद्योग - झेरॉक्स मशीन
६) गुरुमाऊली महिला बचत गट, धापेवाडा
उद्योग- शर्ट
७) गायत्री महिला बचत गट, तेलगाव
उद्योग- कागदी पिशव्या
८) आदर्श महिला बचत गट, कळंबी
उद्योग - एलईडी लाईट सीरीज