ग्रामीणमध्ये स्पर्धा : शहरात शक्तिप्रदर्शन नागपूर : नागपूर ग्रामीणमध्ये हिंगणा, उमरेड, सावनेर आणि कामठी असे चार मतदारसंघ भाजपकडे आहेत. यापैकी सावनेरवगळता तीन ठिकाणी पक्षाचे आमदार आहेत. हिंगण्यातून विद्यमान आमदार विजय घोडमारे यांच्यासह जि.प.च्या अध्यक्षा संध्या गोतमारे यांनी दावा केला आहे. उमरेडमधून विद्यमान आमदार सुधीर पारवे यांच्यासह डॉ. संजय मेश्राम आणि अरविंद गजभिये यांनी दावा केला. डॉ. मेश्राम हे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.कामठीमधून फक्त विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचेच नाव आले. सावनेर मतदारसंघात उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती. हा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. येथून गतवेळी पराभूत झालेले आशिष देशमुख यांच्यासह जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, सोनबा मुसळे, प्रकाश टेकाडे आणि रमेश जैन यांनी उमेदवारी मागितली.शहरात मध्य नागपुरातून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्यासह महापालिकेतील सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, गिरीश व्यास, माजी आमदार यशवंत बाजीराव, श्रीपाद रिसालदार, नगरसेवक दयाशंकर तिवारी, विलास त्रिवादी यांच्यासह १९ इच्छुकांनी दावेदारी पुढे केली. उत्तर नागपुरात इच्छुकांची संख्या ५६ होती. त्यात प्रामुख्याने माजी आमदार भोला बढेल, संदीप गवई, वनिता तिरपुडे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, रमेश वानखेडे, मधुसूदन गवई, यांचा समावेश होता. ही जागा आठवले गटासाठी सोडू नये, अशी सूचना कार्यकर्त्यांनी निरीक्षकांकडे केली. भारतीय जनता पक्षाने शहरातील सर्व सहाही जागा लढवाव्यात , अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे यांनी पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत केली. राज्याच्या सांसदीय मंडळाने याबाबत निर्णय घ्यावा, असेही खोपडे म्हणाले. दक्षिणसाठी एकमुखी आग्रह शिवसेनेच्या कोट्यात असलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ भाजपसाठी सोडावा अशी एकमुखी मागणी या मतदारसंघातील भाजप नेते नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, नगरसेवक सुधाकर कोहळे, सतीश होले आदींनी केली. या मतदारसंघातून शिवसेना सातत्याने पराभूत होत आहे, तर दुसरीकडे भाजपची शक्ती या मतदारसंघात वाढली आहे, असे या नेत्यांनी निरीक्षकांना पटवून दिले.(प्रतिनिधी)समीर मेघेंचा पश्चिमवर दावामाजी खासदार दत्ता मेघे यांच्या भाजप प्रवेशानंतर पूत्र समीर मेघे हे पश्चिमवर दावा करतील, असे बोलले जात होते. या राजकीय घडामोडीमुळे पश्चिम भाजपमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, कुणीही पुढे येऊन याबाबत वाच्यता करीत नव्हते. मात्र, मंगळवारी पश्चिमच्या मुलाखतीसाठी समीर मेघे पोहचले. त्यांनी निरीक्षकांपुढे दावेदारी सादर केली. त्यामुळे ते पश्चिमसाठी इच्छुक असल्याचे आता स्पष्ट झाले. विशेष म्हणजे विद्यमान आ. सुधाकरराव देशमुख यांनीही इच्छा व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनीही देशमुख यांनाच पुन्हा संधी देण्याची मागणी केली. माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष रमेश चोपडे, शशीकांत बोदड, नगरसेवक भूषण शिंगणे, माजी महापौर व नगरसेविका माया इवनाते, जगदीश ग्वालबंसी, नवनितसिंग तुली, सुनील अग्रवाल, प्रा. विजय केवलरामानी, जयंती ठाकूर यांनीही ताकदीने स्वत:ची दावेदारी सादर केली. मुलाखती संपत असताना माजी नगरसेवक बाबा मैंद व प्रभाग अध्यक्ष अभय दिक्षीत हे देखील स्वत:साठी उमेदवारासाठी पोहचले. या वेळी प्रभातील अध्यक्ष, महामंत्री, मंडळ पदाधिकारी अशा काही पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निरीक्षकांची भेट घेतली. आ. सुधाकरराव देशमुख लढण्यास इच्छुक नसतील तर जुने पदाधिकारी असलेले रमेश चोपडे, माया इवनाते, शशिकांत बोदड व जगदीश ग्वालबंसी यांच्यापैकी एकाला संधी द्यावी, असे निवेदन निरीक्षकांना दिले. नावे संसदीय मंडळाकडे देणारनिवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून सर्व जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भाजपकडे असलेल्या मतदारसंघातील इच्छुकांची नावे पक्षाच्या संसदीय मंडळाकडे देण्यात येतील. तेथून केंद्रीय संसदीय मंडळाकडे ते पाठविले जातील व त्यानंतरच उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे पक्षाचे निरीक्षक व आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितिले. मित्रपक्षाकडे असलेल्या मतदारसंघातील मुलाखती केवळ पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले. युती, जागा वाटप आणि संबधित इतर प्रश्नांवर शेलार यांनी बोलणे टाळले. आता मुलाखती झाल्या पण यानंतरही राज्य सांसदीय मंडळाकडे आलेल्या नावांवर विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दुसरे निरीक्षक अतुल भातखळकर, आमदार अनिल सोले, शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार उपस्थित होते.
आशा सत्तेची, दावेदारी अनेकांची
By admin | Updated: August 6, 2014 01:12 IST