हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : बाजारांच्या दुरवस्थेचे प्रकरणनागपूर : महानगरपालिकेने बुधवारी बाजारांच्या दुरवस्थेच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांच्याकडे मनुष्यबळ व यंत्रांची कमतरता असल्याची माहिती दिली. तसेच, अशाही परिस्थितीत शहरात साफसफाई ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.‘लोकमत’ने शहरातील अनधिकृत बाजार, बाजारातील अस्वच्छता, अत्याधुनिक बाजार उभारण्याची गरज, अतिक्रमण इत्यादीसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. न्यायालयाच्या निर्देशावरून मनपाने यावर उत्तर सादर केले आहे. मनपाकडे संपूर्ण शहरासाठी केवळ एकच अतिक्रमणविरोधी पथक आहे. हे पथक पोलिसांचे संरक्षण मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन अतिक्रमण हटविण्याचे काम करते. मनपा एका खासगी कंपनीमार्फत हॉकर्सची नोंदणी करीत आहे. आतापर्यंत ३५ हजार २४६ हॉकर्सची नोंदणी झाली आहे. हॉकर्स झोन तयार करण्यासाठी २९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती हा विषय हाताळीत आहे. शहरातील कचरा उचलण्याचे काम कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी रोज ८ ते १० टन कचरा गोळ करून भांडेवाडीत साठवते. या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मंगळवारीत आधुनिक मासळी बाजार उभारण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा त्रास संपलाय अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मनपाकडे मनुष्यबळ व यंत्रांची कमतरता
By admin | Updated: April 7, 2016 03:07 IST