अमरावती : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारा अकोला येथे नव्याने वखार केंद्र सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात वखार महामंडळाची २६ वखार केंद्र आहेत. त्यात भर पडली आहे. शेतकर्यांना वखार केंद्राच्या साठवणूक गोदामात ५0 टक्के भाड्यात सूट दिली जाते. तसेच वखार पावतीवर राष्ट्रीयकृत बँकांद्वारे तारणकर्ज देण्यात येते. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, आकोट व तेल्हारा येथे महामंडळाची वखार केंद्र सुरू आहेत. चौथे केंद्र शिवणी औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. या गोदामाची साठवण क्षमता ११,७८0 मेट्रिक टन इतकी आहे. हंगामात शेतकरी एकाच वेळी माल विकायला नेतात. बाजारात आवक वाढल्यास मालाला भाव कमी मिळतो. हंगामात शेतातून आलेला माल लगेच बाजारात न विकता साठवणूक करून विकल्यास शेतकर्यांना फायदा होतो. शेतकर्याकडे धान्य साठवणुकीसाठी जागा नसते, उंदीर, घूस व आद्र्रता यामुळेही मालाचे नुकसान होते. आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती यामुळेही नुकसान होऊ शकते. यासाठी शासनाने ही गोदामे बांधली आहेत. या गोदामास १00 टक्के विमा संरक्षण मिळते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अकोला केंद्र सुरू
By admin | Updated: May 16, 2014 00:08 IST