सुमेध वाघमारे / नागपूर
राज्यातील गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणारी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आॅक्सिजनवर आहे. बिले थकल्याने पुरवठादाराने औषध देणे बंद केले आहे. रुग्णालयाच्या दरकरारावरही शस्त्रक्रियांना लागणारी औषधे व साहित्य नाही. यामुळे मागील दीड महिन्यापासून हृदयावरील शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे, सुपरच्या या योजनेतील २५० क्लेमला मंजुरी मिळाली आहे. यातून १ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपये रुग्णालयाच्या तिजोरीत जमा झाले आहे; असे असताना औषध पुरठादाराचे थकीत असलेले ९३ लाख रुपये न देता रुग्णांना वेठीस धरण्यात येत आहे.या योजनेतील लाभार्थी रेखा राजेश भुजाडे (४२) हिला वेळेवर ‘पेसमेकर’ उपलब्ध करून देण्यात आले नाही. यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही या रुग्णालयाची स्थिती सुधारलेली नाही. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. या योजनेला पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. त्यामुळे ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेत ९२७ आजारांचा समावेश आहे. यासाठी तीन शासकीय रुग्णालयांसह ३२ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. यात मेडिकल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये ही योजना मात्र नियोजन नसल्याने ‘जीवघेणी’ ठरत आहे.