काटोल भागातील थरार : चोरीची वाच्यता केल्याने घातले होते कुऱ्हाडीने घावनागपूर : चोरीची वाच्यता केल्याने चौकीदारावर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी मजुराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. विनोद वासुदेव बालपांडे (३५), असे आरोपीचे नाव असून तो नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा येथील रहिवासी आहे. शंकर नारायणराव कोकाटे (४५), असे मृत चौकीदाराचे नाव होते. तो नरखेड तालुक्यातीलच मदना येथील रहिवासी होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी, लिंगा (पारडी) येथील रहिवासी प्रशांत पुंडलिकराव भोयर यांनी आपल्या शेतावर बायो डिझेल फिल्टर प्लॅन्टचे बांधकाम सुरू केले होते. या बांधकामाचे कंत्राट त्यांनी काटोल येथील मनोज बन्सीलाल अहुजा यांना दिले होते. या बांधकामावर विनोद बालपांडे, प्रकाश चिंचोरिया, श्रावण घाटोड आणि इतर हे मजूर होते. याच बांधकामाच्या ठिकाणी शंकर कोकाटे हा चौकीदार होता. १६ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रशांत भोयर यांनी नागपूर येथून छताचे २८ चॅनल आणि ४ अँगल आणून ते बांधकामाच्या ठिकाणी ठेवले होते. १७ फेब्रुवारीच्या सायंकाळी विनोद बालपांडे याने २ अँगल आणि १ चॅनलची चोरी केली होती. १९ फेब्रुवारी रोजी नागपूरहून फॅब्रिकेशनचे काम करणारे कामगार आले होते. अँगल आणि चॅनलला पेंटिंग करीत असताना त्यांना दोन अँगल आणि एक चॅनल कमी असल्याचे आढळून येताच त्यांनी मालक प्रशांत भोयर यांना सांगितले होते. भोयर यांनी बांधकाम कंत्राटदार अहुजा यांच्याकडे विचारणा केली होती. अहुजा यांनी या चोरीबाबत चौकीदाराकडे विचारणा केली असता त्याने विनोद बालपांडे याचे नाव सांगितले होते. अहुजा यांनी बालपांडे याला विचारणा केली असता आधी त्याने टाळाटाळ केली होती. नंतर त्याने चोरीची कबुली देऊन अँगल आणि चॅनल काढून देतो, असे म्हटले होते. तो अहुजा आणि इतर मजुरांना सोबत घेऊन जात असता अर्ध्या रस्त्यातून बेपत्ता झाला होता. १९ फेब्रुवारीच्या रात्री केव्हा तरी त्याने घटनास्थळ गाठून चौकीदार शंकर कोकाटे याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून केला होता. २० फेब्रुवारीच्या सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास चौकीदाराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. खून केल्यानंतर बालपांडे हा पळून गेला होता. त्याला २० फेब्रुवारी रोजीच पोलिसांनी वरुड तालुक्याच्या आमनेर येथे अटक केली होती. (प्रतिनिधी)परिस्थितीजन्य पुराव्यांची जुळली साखळीया प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी केला होता. घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यांनी आरोपीविरुद्ध मजबूत परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात ते आरोपपत्रासह सादर केले. सरकार पक्षाने या परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तंतोतंत जोडली. न्यायालयात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील माधुरी मोटघरे, आरोपीच्यावतीने अॅड. नितीन वासे यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एन. म्हात्रे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण महल्ले आणि रमेश नवले यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.
चौकीदाराच्या खुनात मजुरास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 03:07 IST