‘एसडीआरएफ’च्या निधी वितरणात विदर्भावर अन्याय; नागपूर, अमरावतीच्या वाट्याला १८ टक्केच निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 07:00 AM2021-09-15T07:00:00+5:302021-09-15T07:00:07+5:30

Nagpur News राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्य शासनाने कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी सर्व जिल्ह्यांना निधीचे वितरण केले. विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाट्याला अवघा १८ टक्के निधी आला आहे.

Injustice in Vidarbha in distribution of SDRF funds; Nagpur, Amravati share only 18% | ‘एसडीआरएफ’च्या निधी वितरणात विदर्भावर अन्याय; नागपूर, अमरावतीच्या वाट्याला १८ टक्केच निधी

‘एसडीआरएफ’च्या निधी वितरणात विदर्भावर अन्याय; नागपूर, अमरावतीच्या वाट्याला १८ टक्केच निधी

Next
ठळक मुद्दे रुग्ण कमी असतानादेखील औरंगाबादवर राज्य शासनाची मेहेरबानी

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्य शासनाने कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी सर्व जिल्ह्यांना निधीचे वितरण केले. दोन्ही लाटांमध्ये महाराष्ट्र पोळून निघाला असताना मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ३९ टक्केच निधीचे वितरण केले. आश्चर्याची बाब म्हणजे निधी वितरणातदेखील दुजाभाव करण्यात आला असून, विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाट्याला अवघा १८ टक्के निधी आला आहे. दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरीत करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (Injustice in Vidarbha in distribution of SDRF funds; Nagpur, Amravati share only 18%)

 

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे विचारणा केली होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची एकूण रक्कम ३,४३६ कोटी ८० लाख इतकी असून, यात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के इतका आहे. कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी शासनाने मार्च २०२०मध्ये ३५ टक्के व सप्टेंबर २०२०मध्ये ५० टक्के खर्चाची मर्यादा निश्चित केली. सप्टेंबरनंतर ५० टक्के निधीचे वितरण व्हायला हवे होते. प्रत्यक्षात मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत १ हजार ३६६ कोटी ६८ लाख ४३ हजार इतक्याच निधीचे वितरण करण्यात आले.

नागपूर व अमरावती विभाग मिळून ११ लाखांहून अधिक रुग्ण सापडले व २० हजारांहून अधिक मृत्यू झाले. परंतु प्रत्यक्षात २५१ कोटी १९ लाख ४४ हजारांचीच रक्कम वितरीत करण्यात आली. दुसरीकडे औरंगाबाद विभागात ६ लाख ३५ हजार ८४६ रुग्ण आढळले व १६ हजार ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु तरीदेखील विभागाला विदर्भाहून जास्त अनुदान मिळाले. औरंगाबादला मिळालेल्या निधीचा आकडा ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार इतका होता. नाशिकमध्येदेखील साडेनऊ लाखांहून अधिक रुग्ण असताना १५५ कोटींचीच रक्कम मिळाली. शासनाने कशाच्या आधारावर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे वितरण केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सर्वाधिक निधी पुणे विभागाला

कोरोनाची सर्वात जास्त दाहकता पुणे विभागात होती. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार तेथे जवळपास २० लाख रुग्ण आढळले व ४२ हजारांहून अधिक मृत्यू झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत विभागाला ३४८ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले, तर कोकण विभागाला ३२४ कोटी ६१ लाख प्राप्त झाले.

विभाग - एसडीआरएफअंतर्गत मिळालेला निधी - एकूण रुग्ण - मृत्यू

नागपूर - १७६ कोटी ९९ लाख २८ हजार - ७,७०,३६० - १४,२६१

अमरावती - ७४ कोटी २० लाख १६ हजार - ३,५७,७०३ - ६,२३१

औरंगाबाद - ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार - ६,३५,८४६ - १६,९०६

नाशिक - १३१ कोटी ५१ लाख ८४ हजार - ९,५२,४०१ - १९,५८५

पुणे - ३४६ कोटी ४६ लाख ३६ हजार - १९,९५,९९०- ४२,२२०

कोकण - ३२४ कोटी ६१ लाख ८१ हजार - १७,८८,९७३ - ३८,८५५

Web Title: Injustice in Vidarbha in distribution of SDRF funds; Nagpur, Amravati share only 18%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.