सुमेध वाघमारे
नागपूर : मृत्यू अटळ आहे म्हणून काही खासगी हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिला. शेवटचा पर्याय म्हणून रुग्णाला मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. परंतु परिचारिकांचा संप व हृदयाचे पंपिंग कमी असल्याने हृदय शल्यचिकित्सा विभागानेही नकार दिला. मात्र, रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. पी. पी. देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपला अनुभव व कौशल्याच्या बळावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत महिलेला जीवनदान दिले.
उमरखेड येथील ३८ वर्षीय महिलेला दोन महिन्यापासून दम लागत होता. बसून राहिले तरी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. या कालावधीत वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखविले. परंतु आजाराचे निदान होत नव्हते. हृदयाची पंपिंग ढासळून २० टक्क्यावर आले होते. प्रकृती चिंताजनक होती. सावंगी मेघे या रुग्णालयात रुग्णालयात भरती केले असता, दुर्मिळ व जीवघेणा आजार ‘आरएसओव्ही टू आरव्हीओटी’ असल्याचे निदान झाले. यात हृदयामधील मुख्य रक्तवाहिनी (एओर्टा) हृदयाच्या उजव्या बाजूच्या कप्प्यात फाटली होती. रक्तवाहिनीला ‘१० एमएम’चे छिद्र पडले होते.
रुग्णाची गंभीर स्थिती पाहता उपचारास दिला नकार
‘आरएसओव्ही टू आरव्हीओटी’मुळे जीवाला धोका निर्माण झाला होता. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन, काही खासगी डॉक्टरांनी उपचाराला नकार दिला. मृत्यू अटळ असल्याचे पाहता नातेवाईकांनी २९ मे रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागात दाखल केले. रुग्णाच्या अंगावर पूर्ण सूज आली होती. रुग्ण झोपला असतानाही दम लागत होता. विभागाचे प्रमुख डॉ. देशमुख यांनी त्यांची तपासणी करून, दोन दिवसात त्यांची प्रकृती स्थिर केली. तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. यामुळे हॉस्पिटलच्या शल्यचिकित्सकांकडे रुग्णाला पाठविले. परंतु परिचारिकांचा संप, त्यात रुग्णाचे पंपिंग कमी असल्याचे कारण पुढे करीत, रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यास तोंडी नकार दिला.
‘एडीओआय-१’ उपकरणाद्वारे केली शस्त्रक्रिया
मरणाच्या दारात पोहोचलेल्या रुग्णाला बाहेर आणण्यासाठी डॉ. देशमुख यांनीच पुढाकार घेतला. हृदयरोगाच्या विभागाच्या निवासी डॉक्टरांनी परिचारिकांची भूमिका बजावली. डॉ. देशमुख यांनी ‘एडीओआय-१’ उपकरणाच्या मदतीने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. तातडीच्या शस्त्रक्रियेने रुग्णाला नवे जीवन मिळाले. ही शस्त्रक्रिया डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वात डॉ. अतुल राजपूत यांच्या सहकार्याने करण्यात आली. डॉ. हार्दिक मोरे, डॉ. राज त्रिवेदी, डॉ. अर्शियन व डॉ. नील यांनी परिचारिकांची भूमिका बजावली.