राकेश घानोडे नागपूरनागपूरला ‘स्मार्ट सिटी’ करताना शासनाला विविध पातळ्यांवर लढावे लागणार आहे. केवळ वर-वर विकास करून चालणार नाही तर, वर्तमानातील विविध समस्यांना मुळासकट उपटून फेकावे लागणार आहे. अवैध पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमण, अनधिकृत बाजार व फेरीवाल्यांचा बेशिस्तपणा या समस्यांनी शहराची लाईफलाईन असलेल्या रस्त्यांना जखडून टाकले आहे. या समस्यांतून निर्माण झालेला वाहतूक कोंडीचा प्रश्न तमाम नागपूरकरांना हैराण करीत आहे. मुख्य रस्ते व बाजारपेठांमधून वाहने चालविताना नागरिकांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा प्रश्न किती गंभीर आहे याची खऱ्या अर्थाने जाणीव दुपारी १२ वाजतापर्यंत व सायंकाळी ५ वाजतानंतर होते. शहरातील रस्ते रुंद आहेत. प्रत्येक रस्त्याच्या बाजूला फुटपाथ आहे. परंतु, त्याचा पूर्ण उपयोगच करता येत नाही ही खंत आहे. ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न साकारण्यासाठी शासनाने महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, वाहतूक पोलीस व इतर संबंधित स्थानिक विभागांशी मिळून अल्प व दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे.रस्त्यांवर अवैध पार्किंगअवैध पार्किंगमुळे शहरातील रुंद रस्ते अरुंद वाटायला लागले आहेत. अनेक रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कार व मोटरसायकल पार्क केलेल्या असतात. परिणामी वाहतुकीचा प्रवाह जागोजागी खंडित होतो. यातून वाहतूक कोंडी निर्माण होते. अपघात होतात. रहाटे कॉलनी ते व्हेरायटी चौक, व्हेरायटी चौक ते महाराष्ट्र बँक, झॉसी राणी चौक ते शनी मंदिर, व्हेरायटी चौक ते नागपूर विद्यापीठ, व्हीएनआयटी ते लोकमत चौक, आकाशवाणी ते जिल्हाधिकारी कार्यालय, बैद्यनाथ चौक ते मध्यवर्ती बस स्थानक, कॉटन मार्केट चौक ते रामझुला उड्डाणपूल, लोखंडी पूल ते गांधीसागर तलाव, तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौक, पंचशील चौक ते धंतोली पोलीस ठाणे, मेडिकल चौक ते क्रीडा चौक, अंजुमन कॉलेज ते मानकापूर चौक, गांधीबाग व इतवारी मार्केट परिसर, महाल मार्केट परिसर, स्मृती चित्रपटगृह ते अंजुमन कॉलेज इत्यादी रस्त्यांवर नेहमीच वाहने पार्क केलेली असतात.अनधिकृत बाजारशहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बाजार भरतात. पारडीतील अनधिकृत बाजारासंदर्भात मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हा बाजार गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे पण, त्यावर उपाय शोधण्यात महापालिकेला अद्यापही यश मिळालेले नाही. यासाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे. पारडी बाजारामुळे गेल्या पाच वर्षांत शंभरावर नागरिकांनी प्राण गमावले आहेत. फुटपाथवर अतिक्रमणशहरातील रस्ते पादचाऱ्यांना चालण्यासाठी बांधण्यात आले आहेत की, व्यवसाय करण्यासाठी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्य रस्त्यांवरील बहुतेक फुटपाथवर पानठेले, चहा टपरी, दुपट्टे विक्रेते, कपडे विक्रेते, लिंबू पाणी विक्रेते, जडीबुटी विक्रेते, फळांचा रस विक्रेते, चष्मे विक्रेते, उसाचा रस विक्रेते, फुलझाडे विक्रेते, मडके विक्रेते, बाहुल्या विक्रेते आदींनी व्यवसाय थाटलेला आहे. सीताबर्डी, महाल, धंतोली, सक्करदरा, सदर, मंगळवारी, वर्धमाननगर, गणेशपेठ, धरमपेठ, प्रतापनगर, कॉटन मार्केट, मोमीनपुरा यासह काही भागात ही समस्या फारच गंभीर झाली आहे. फुटपाथ रिकामे राहात नसल्यामुळे पादचारी रस्त्यावरून चालतात. यातून वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. पादचाऱ्यांचे अपघात होतात. काही अपघातात पादचाऱ्यांचा मृत्यूही होतो.हॉकर्स झोनचा प्रस्ताव रखडलाशहरात ५३ हॉकर्स झोन तयार करण्याचा प्रस्ताव आहे, पण त्यावर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे भाजीपाला, कपडे, पादत्राणे इत्यादी विविध वस्तू रस्त्यांवर ठाण मांडून विकल्या जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातठेले उभे असतात. परिणामी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी पायदळ चालणेही कठीण होते. ही बाब लक्षात घेता हायकोर्टाने एखाद्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हॉकर्स झोन तयार करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्यावरही अंमलबजावणी झालेली नाही.
कशी होणार ‘स्मार्ट सिटी’
By admin | Updated: May 21, 2015 02:32 IST