पतंगांनी आकाश झाले रंगबिरंगीनागपूर : पतंगोत्सव म्हणजे तरुणाईच्या खास उत्साहाचा उत्सवच. आकाशात आपली पतंग उंच उडवत ठेवायची आणि इतरांची पतंग काटल्यावर ‘ओ काट...’ची आरोळी ठोकून पुन्हा दुसऱ्या पतंगाकडे वक्रदृष्टी टाकायची. आकाशातल्या सर्वच पतंग काटून आकाशात फक्त आपलीच पतंग दिमाखात उडवायची, अशी सर्वच पतंगबाजांची इच्छा असते. त्यासाठीच सारी चढाओढ सुरू असते पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते, वारे बदलतात. त्याची मजा घेण्यासाठी असलेल्या या उत्सवात फक्त तरुणाईच नाही तर सारे आबालवृद्ध शहरात उत्साहात होते. पतंग उडविण्याची मजा घेण्यासाठी गुरुवारी सारेच घरांच्या, अपार्टमेन्टस्च्या टेरेसवर एकत्र झाले होते. पतंगांनी सारे आकाशच आज झाकोळले आणि आकाश रंगबिरंगी पतंगांच्या पुजक्यांनी सजले होते. हा पतंगोत्सव साजरा करण्यासाठी सारी जय्यत तयारी आधीच झाली होती. मांजा, चक्री, पतंग कटल्यावर दुसऱ्या पतंगची व्यवस्था, पतंगांनी झाप खाऊ नये म्हणून त्याला कन्ना बांधणे वगैरे सारेच जय्यत होते. अनेकांनी टेरेसवर डेक, म्युझिक सिस्टिम्स् आणि अत्याधुनिक ध्वनियंत्रणांची सोय केली होती. नव्या आणि जुन्या ऱ्हिदमिक गीतांचा, अधूनमधून नृत्याचाही एकत्रित आनंद घेत आकाशात उंच पतंग उडविण्यात तरुणाईने अख्खा दिवस गाजविला. यात लहान मुलांचा सहभाग यंदा लक्षणीय होता. साधारणत: पतंगोत्सव तरुण मुले साजरा करतात. यात युवती सहभागी होत नव्हत्या. पण गेल्या काही वर्षात युवतींचा सहभाग पतंग उडविण्यात वाढतो आहे. यंदा तर युवतींसह अनेक महिलाही सहकुटुंब पतंग उडविण्यात सहभागी झाल्या होत्या. युवतींचे ग्रुप्स शहरातल्या प्रत्येक भागात टेरेसवर ‘ओ काट...’ची आरोळी ठोकत पतंग उडविण्यात उन्मादक स्थितीत होते. दिवसभर पतंग उडवायची म्हणजे पोटाचीही काळजी घेणे आलेच. काहींनी मसाले भाताचा बेत केला तर काहींनी इडली-सांबार, पोहे आदी नाश्ता तयार करून टेरेसवरच ठेवला होता. युवकांनी मात्र समोसे, कचोरी, चिवडा आदी पदार्थ ठेवले होते. पतंग उडविण्याच्या नादात शहरात अनेकांनी दुपारचे जेवण वर्ज्य केले. शहरात सर्वत्र म्युझिक सिस्टम्स्वर गीतांची रेलचेल आणि युवकांचा जल्लोष दिसत होता. (प्रतिनिधी)
‘ओ काट..’ची आरोळी अन् उत्साहाला उधाण
By admin | Updated: January 16, 2015 01:03 IST