हिंगणा/कळमेश्वर/नरखेड/रामटेक/काटोल : जिल्ह्यातील हिंगणा आणि कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांचा टक्का वाढत आहे. मंगळवारी या दोन्ही तालुक्यांत ३० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने येथे संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे. यासोबतच काटोल तालुक्यात कोरोनाची साखळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. रामटेक तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नसल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी २१५ रुग्णांची भर पडली.
हिंगणा तालुक्यात मंगळवारी ७०४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी (१७), डिगडोह (८), इसासनी, हिंगणा व निलडोह येथे प्रत्येकी ४, टाकळघाट व रायपूर येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२६५ इतकी झाली आहे. यातील ४००३ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत १०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इकडे प्रशासनाच्या वतीने विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा वेगही वाढविण्यात आला आहे.
कळमेश्वर तालुक्यात मंगळवारी आणखी २१ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्र आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी दहा रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात लोणारा येथे ५, मोहपा (४), मोहगाव आणि धापेवाडा (बु.) येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात मंगळवारी ४ रुग्णांची नोंद झाली. शहरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. चारही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांत जलालखेडा येथील १, तर मोवाड येथील तिघांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७१, तर शहरात ९३ इतकी झाली आहे.
रामटेक तालुक्यात मंगळवारी एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११२८ इतकी झाली आहे. यातील हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात मंगळवारी २३५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी दिली.
सत्ता पक्षनेते ठाकूर यांच्यासह ११ बाधित
काटोल नगर परिषद क्षेत्रात कोरोनाची साखळी अधिक घट्ट होत आहे. मंगळवारी तालुक्यात ११ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल शहरात नगर परिषदेचे सत्ता पक्षनेते चरणसिंग ठाकूर यांच्यासह ९ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ठाकूर यांनी संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आणि काटोलकरांना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. शहरात १०८ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात पंचवटी येथे तीन, सरस्वतीनगर व राठी ले-आउट येथील प्रत्येकी दोन, तर धंतोली, रेल्वे स्टेशन परिसरात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात नायगाव व खानगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.