रवी वानखेडे : ‘वर्ल्ड आॅर्गन डोनेशन डे’निमित्त परिसंवादनागपूर : ‘ब्रेन डेथ’ झालेल्या व्यक्तीने आपले अवयव दान करून इतरांचे प्राण वाचविल्यास अनेक जणांना जीवदान देणे शक्य होते, यासाठी नातेवाईकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब नागपूरच्या आॅर्गन डोनेशन अवेअरनेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडे यांनी केले.मोहन फाऊंडेशन, झोनल ट्रान्सप्लान्ट को-आॅर्डिनेशन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्ल्ड आॅर्गन डोनेशन डे’निमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर उपस्थित होते. डॉ. रवी वानखेडे म्हणाले, जगात पहिल्यांदा १९०५ मध्ये कॉर्निआचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर १९५० मध्ये अमेरकेच्या शिकागो येथे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. जिवंत असताना व्यक्तीला रक्त, बोनमॅरो, किडनी, लिव्हरचा काही भाग, फुफ्फुसाचा काही भाग दान देता येऊ शकतो. नैसर्गिक आणि ब्रेन डेथ असे मृत्यूचे दोन प्रकार आहेत. ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचे ९० प्रकारचे अवयव दान करून इतरांचे प्राण वाचविणे शक्य होते. ब्रेन डेथ झालेल्या रुग्णाच्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करून आणि नंतर चार डॉक्टरांनी प्रमाणित केल्यास त्या रुग्णाचा ‘ब्रेन डेथ’ झाल्याचे जाहीर करण्यात येते. अवयव दान करून घेतल्यास इतर असंख्य रुग्णांच्या जीविताचा प्रश्न मार्गी लागू शकतो. जगात ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचे अवयव दानाचे प्रमाण मोठे आहे. परंतु भारतात फक्त ०.२६ टक्केच ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीचे अवयव दान देण्यात येतात. भारतात चार टक्केही अवयव दान झाल्यास दक्षिण आशियातील सर्व देशांना पुरविता येतील एवढे अवयव भारतात उपलब्ध होऊ शकतात. अवयवदानासाठी प्रत्येक धर्मात परवानगी असून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्थांनी प्रयत्न करून अभियान राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवयव दानासाठी विश्वासात घ्या
By admin | Updated: August 14, 2014 01:22 IST