हिंदी दिनानिमित्त आयोजित ‘विचार सत्रा’त जनार्दन द्विवेदी यांचे आवाहन नागपूर : भारतीय भाषांप्रति आवड व स्वाभिमान वाढवा. यातून चेतना निर्माण होईल तेव्हा कुठे मातृभाषेत बोलताना वाटणारा कमीपणा, मनात निर्माण होणारा न्यूनगंड, अशा सर्व समस्या आपोआपच दूर होतील, असे आवाहन अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस व राज्यसभा सदस्य व शिक्षणतज्ज्ञ जनार्दन द्विवेदी यांनी केले. बहुतांश भारतीय भाषांचे हे वैशिष्ट्य आहे. ज्या भाषेत जे बोलले जाते तेच लिहिले जाते. त्यामुळे या वैज्ञानिक भाषा आहेत. अशा वैज्ञानिक भाषा ज्या देशात असतील त्या देशाला अकारण चिंता करण्याची गरज नाही, असा विश्वासही त्यांना व्यक्त केला. लोकमत समाचारतर्फे नीरीच्या विशेष सहकार्याने ‘हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी केले जाणारे प्रयत्न व आम आदमीची भूमिका’ या विषयावर रविवारी नीरीच्या सभागृहात विचार सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्य वक्ते म्हणून द्विवेदी बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र होते. राज्यसभा सदस्य व लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे , नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. हिंदीच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणारे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी म्हणाले, भारतीय भाषांना महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात व्यवस्थेची नाही तर सामान्य माणसाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळेच भारतीय भाषा जिवंत आहेत. कमी लेखण्याच्या वृत्तीमुळेच हिंदी व अन्य भाषांची अशी दशा झाली आहे. युनेस्कोच्या एका अहवालात म्हटले आहे की, जगात सुमारे ७००० भाषा आहेत. त्यापैकी ५००० भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगातील ९२ टक्के लोक ५ टक्के भाषा बोलतात. प्रश्न इंग्रजीचा नाही तर प्रवृत्तीचा आहे. हिंदी व भारतीय भाषांचा जे वापर करतात, त्याच भाषेत ते स्वप्न पाहतात. त्यांच्यामुळेच आपल्या भाषा पुढेही जिवंत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘विचार सत्र’चे अध्यक्ष म्हणून बोलताना कुलगुरू गिरीश्वर मिश्र म्हणाले, आपल्या भाषेत संवाद साधताना, व्यवहार करताना कोणताही कमीपणा किंवा लाज वाटू नये. आपल्या भाषांबाबत आपण मनात अनावश्यक भीती निर्माण केली आहे. ती भीती बाहेर काढावी लागेल. भाषेवर संस्कार करून ते शक्य आहे. सद्यस्थितीत हिंदी व भारतीय भाषांना आपल्यापासून दूर करण्याचा कट रचला जात आहे. सध्या समाजात हिंदी व इंग्लिशचे मिश्रण असलेली ‘हिंग्लिश’ च्या रूपात आणखी एक भाषा आली आहे. त्यामुळे आता हिंदी भाषेचाच नव्हे तर हिंदी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकशाहीत लोकमत महत्त्वाचे असते. भाषेबाबत आवश्यक असलेले प्रश्न लावून धरत वृत्तपत्राच्या रूपात ‘लोकमत’ आपली भूमिका चोखपणे बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष अतिथी म्हणून बोलताना खा. विजय दर्डा म्हणाले, हिंदी कोणत्या एका क्षेत्रात किंवा एका बोलीपासून विकसित झालेली भाषा नाही. तिच्या विकासात उर्दूपासून ते भारतातील बऱ्याच भाषा व बोलींचे योगदान आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय एकतेच्या रूपात हिंदी राष्ट्रभाषा म्हणून समोर आली. मात्र, स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शासकीय कामकाजाची भाषा म्हणून हिंदीला ते स्थान प्राप्त झाले नाही जो तिचा संवैधानिक हक्क होता. महाराष्ट्राने हिंदीची प्रचंड सेवा केली आहे. राष्ट्रीय एकतेच्या हितासाठी मराठी भाषिकांनी हिंदीची केलेली सेवा इतर राज्यांसाठी अनुकरणीय आहे. हिंदी समृद्ध करण्यात, तिच्या गद्य व कवितेत परिपक्वता आणण्यात मराठीपासून ते तेलगू, बांगला तसेच अन्य भारतीय भाषांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच ही भाषा राष्ट्रीय एकात्मतेच्या अभिव्यक्तीच्या रूपात समोर आली आहे. संचालन लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र यांनी केले. नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांनी आभार मानले. कार्यक्रमात शहरातील साहित्यिक व हिंदीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी खा. विजय दर्डा यांनी काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांचे स्वागत पुष्पगुच्छ व ‘फ्रीडम आॅफ प्रेस’ च्या प्रतिमेची प्रतिकृति देऊन केले. कुलगुरू गिरीश्वर मिश्र यांचे स्वागत लोकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे यांचे स्वागत लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांचे स्वागत उपमहाव्यवस्थापक (प्रोजेक्ट इम्प्लीमेन्टेशन) आशीष जैन व खा. विजय दर्डा यांचे स्वागत औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव यांनी केले. (प्रतिनिधी)
भारतीय भाषांप्रति आवड व स्वाभिमान जागवा
By admin | Updated: June 15, 2015 02:55 IST