नागपूर : श्री गणेश म्हणजे भाविकांचे लाडके आराध्य. त्याच्या स्वागतासाठी सारे शहर सजले आहे. चौकाचौकात रोषणाई, सजावट करण्यात सारे भाविक गुंतले आहेत. गणेश मूर्तीच्या भव्य मिरवणुकीने शहर गजबजले आहे. श्री गणेशाला सार्वजनिक मंडळात आणण्यासाठी तसेच घरोघरी स्थापना करण्यासाठी भाविकांची लगबग चालू आहे आणि रस्त्यांवर बाप्पांच्या लहानमोठ्या मूर्तींचा प्रवास मोठ्या आनंदाने वेगवेगळ्या वाहनातून होतो आहे. गणेश म्हणजे विघ्नहर्ता. विघ्न अर्थात संकट वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकते. सामाजिक संक टही मानवी वर्तणुकीने निर्माण होते. या मानवी अपप्रवृत्तींवर मात करून निकोप समाज निर्माण करण्यासाठी काही मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. गणेशोत्सव म्हटला की विद्युत दिव्यांची आरास, आकर्षक देखावे आणि विविध प्रसिद्ध मंदिराच्या प्रतिकृती आल्याच. यात सातत्याने वाढ होत आहे. यंदा विविध प्रसिद्ध मंदिराच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी मंडळांंनी मोठा खर्च केला आहे. याशिवाय विविध सामाजिक उपक्रमांची मालिकाच गणेश मंडळाने मोठ्या प्रमाणात राबविण्याचे ठरविले आहे. यात रक्तदान शिबिर, चष्मे वितरण, अनाथालयात भोजनदान, गरीब रुग्णांची आरोग्य तपासणी, गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे आणि सायकलचे वितरण असे अनेक उपक्रम आखण्यात आले आहेत.त्यामुळे मंडळांनी सजावटीवर मोठा खर्च केला असला तरी यातून मिळणारा निधी आणि आरतीच्या पैशातून सामाजिक दायित्व जपण्याचा संकल्प केला आहे. राज्याच्या दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांवर विघ्न आले आहे. शेतीतून उत्पादन घेता येणे शक्य नाही. हे विघ्न दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याच्या भक्तांनी निधी जमा करण्याचा आणि हा निधी मुख्यमंत्री निधीत देण्याचा संकल्पही केला आहे. याशिवाय अनेकांनी पर्यावरणाचा संदेश देण्याचा, बेटी बचाओ अभियान राबविण्याचा, शिक्षणाचा प्रसार करण्याचा संकल्प केला आहे. (प्रतिनिधी)
निर्विघ्नं कुरु मे देव...
By admin | Updated: September 17, 2015 03:25 IST