मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी होणार सहभागीनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हिजन २०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी कामठी रोड येथील ईडन ग्रीन्झ् येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता या परिषदेचे उद्घाटन होईल. नागपूर शहरातील नागरी प्रश्न, समस्या, पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध विकासाची गरज, भविष्यातील आव्हाने, मनपा-नासुप्र, सरकार आणि नागरिकांची जबाबदारी आदी विषयांवर एकूण चार चर्चासत्रांत या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी ४ वाजता परिषदेचा समारोप होईल. उद्घाटन समारंभाला राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास आणि गृह (शहर) राज्यमंत्री रणजित पाटील, खा.अजय संचेती (राज्यसभा सदस्य) रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, खा.विकास महात्मे (राज्यसभा सदस्य) आणि महापौर प्रवीण दटके परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या परिषदेला आ.जोगेंद्र कवाडे, आ.अनिल सोले, आ.प्रकाश गजभिये, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकरराव देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, आ.सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, एम.ए.डी.सी.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम्, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि ‘आॅरेंज सिटी वॉटर’चे मुख्य प्रवर्तक अरुण लखानी प्रामुख्याने उपस्थित राहातील.
नागपूरच्या विकासावर होणार महाचर्चा
By admin | Updated: September 6, 2016 02:20 IST