आधी प्रदेश अध्यक्ष व नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपचे नेतृत्त्व करणार्या नितीन गडकरी यांच्यासाठी नागपूरची निवडणूक प्रतिष्ठेची होती. गडकरी यांनी तेवढय़ा सिरिअसली तयारी केली व एक नवा इतिहास रचत नागपुरातून विजयाचा चौकार मारलेले काँग्रेसचे खा. विलास मुत्तेमवार यांना तब्बल २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी ‘क्लिन बोल्ड’ केले. गडकरींना ५ लाख ८७ हजार ७६७ मते तर मुत्तेमवारांना ३ लाख २ हजार ९३९ मते मिळाली. गडकरींवर आरोपांचे बॉम्ब टाकणार्या ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांना तर स्वत:ची अनामतही वाचविता आली नाही. त्यांना ६९ हजार ८१ मते मिळाली. बसपाचे मोहन गायकवाड ९६ हजार ४३५ मतांसह तिसर्या क्रमांकावर राहिले.
की फॅक्टर काय ठरला?
वर्षभरापूर्वी नागपुरातून लढण्याची घोषणा केल्यानंतर गडकरी कामाला लागले होते. समाजातील प्रत्येक घटकाला, जाती, धर्म, पंथ, भाषेची बंधने झुगारून सर्वांंना आपलेसे करण्याचा गडकरींनी प्रयत्न केला. विरोधकांनाही सोबत घेत बेरजेचे राजकारण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जिद्द, आमदार, पदाधिकार्यांचे नियोजन आणि पक्ष संघटनेतील कर्मनिष्ठ कार्यकर्त्यांंंची फळी यामुळे गडकरींनी गड जिंकला.
राज्यात युती सरकारच्या काळात मंत्री असताना गडकरी यांनी केलेल्या विकास कामांमुळे रोडकरी, पूलकरी, विकासकरी, अशी गडकरींची इमेज तयार झाली. विकास पुरुषाची ही इमेज नागपुरातही अधिक कामी आली. त्यामुळे धर्म, जात, समाज, असा कुठलाही फॅक्टर त्यांच्या विरोधात चालला नाही.
२0 वर्षे नागपूरचे प्रतिनिधित्त्व करूनही काँग्रेसचे खा. मुत्तेमवार नागपूरसाठी विशेष काही असे करू शकले नाही. रखडलेला मिहान प्रकल्प, कागदावरच धावणारी मेट्रो याशिवाय कुठलाही प्रकल्प आणण्यात ते अपयशी ठरले. यामुळे जनमत त्यांच्या विरोधात गेले. शिवाय काँग्रेसमधील भांडणेही कारणीभूत ठरली.