वन पर्यटनाला दरवाढीचा बसणार ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:09 AM2021-09-26T04:09:01+5:302021-09-26T04:09:01+5:30
नागपूर : कोरोना अनलॉकनंतर आता परिस्थितीत सुधारणा होत असल्याने अनेक सेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील वन पर्यटनही १ ...
नागपूर : कोरोना अनलॉकनंतर आता परिस्थितीत सुधारणा होत असल्याने अनेक सेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील वन पर्यटनही १ ऑक्टोबरपासृून सुरू होणार असले, तरी काही महिन्यांतच त्याला दरवाढीची झळ बसणार असल्याचे संकेत आहेत.
२०१८पासून वन पर्यटनात दरवाढच झालेली नाही. २०१९मध्ये कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने वन पर्यटनावर बंदी घातली होती. त्यांतर जुलै महिन्यात वन पर्यटनाला मंजुरी मिळाली असली तरी पावसाळ्यामुळे अल्पावधीतच ते बंद झाले होते. पुन्हा ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही बंदी पुढेही कायम चालली. आता अनलॉकनंतर वन विभागाने पुन्हा वन पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ ऑक्टोबरपासून ते सुरू होत आहे.
सध्यातरी पर्यटन शुल्कात आणि निवास व्यवस्थेत दरवाढ लावलेली नसली तरी काही महिन्यांतच ती होणार असल्याचे संकेत आहेत. मागील दीड वर्षाच्या काळात पर्यटन व्यवसायाला प्रचंड झळ बसली. त्याचा परिणाम वन विभागाचे पर्यटनातील उत्पन्न खालावण्यावर झाला. त्यामुळे वन मंत्रालयाकडून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी अलिकडेच पेंच आणि बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासोबतच दरवाढीची शक्यताही वर्तविली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही अद्याप दरवाढ जाहीर केली नसली तरी ती होणार असे दिसत आहे. मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असल्याने वन मंत्रालयाकडून प्रस्ताव गेल्यावर तेच या संदर्भात निर्णय घेतील.