६00 नागरिक बेघर : १७ सिलिंडर्स आगीत फुटले, जीवहानी टळलीगडचांदूर (जि. चंद्रपूर) : येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील मजुरांच्या झोपडपट्टीने शनिवारी आगीचा थरार अनुभवला. या परिसरात अचानकपणे लागलेली आग पाहता पाहता पसरली, भडकली अन् १३७ झोपड्या स्वाहा करुनच शमली. या भीषण घटनेत संपूर्ण घरे भुईसपाट झाली. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या गरिबांच्या वस्तीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त काहीही न उरल्याने ही माणसे आभाळाखाली आली आहेत. दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील विक्रमसिंग बहादुरसिंग भोंड यांच्या घरातून सुरुवातीला धूर निघताना दिसला. त्यानंतर हळूहळू ही आग पसरत गेली. बाजूच्या घरालाही आगीने वेढले. तापलेले ऊन्ह आणि बचावाची अपुरी साधने यामुळे अगदी काही वेळातच आगीने रौद्ररूप घेतले. पाहता पाहता एकापाठोपाठ एक १३७ घरांना कवेत घेऊनच ही आग शमली.विक्रमसिंग भोंड यांच्या घरावरुन वीज तारा गेलेल्या असल्याने शाटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर, काहींच्या मते त्यांचा सिलिंडर सुरू असल्यानेच ही आग लागल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात आग कशाने लागली हे कळू शकले नाही. आग इतकी भीषण होती की, अवघ्या तासाभरात ती संपूर्ण वसाहतीत पोहोचली. गावातील नागरिकांना ही घटना कळताच भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली. पोलिसांना आणि नगर पालिकांना माहिती देऊन आगीचे बंब बोलाविण्यात आले. मात्र आगीच्या भीषणतेपुढे हे सर्व प्रयत्न दुबळे पडले. राजुरा, बल्लारपूर नगरपरिषद, अल्ट्राटेक, अंबुजा व माणिकगड कंपनीचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंंत सर्व काही संपलेले होते. तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले.१७ सिलिंडर्स फुटलेआग इतकी भीषण होती की, जळालेल्या घरांमध्ये असलेल्या १७ सिलिंडरचा स्फोट झाला. त्या आवाजाने परिसरात प्रचंड धास्ती निर्माण झाली. धुराचे लोळ उंच उठत असल्याने आजुबाजूच्या गावातील नागरिकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे एकच गर्दी झाली होती. आगीत पैसे, सोने, धान्य, कपडे, इलेक्ट्रानिक साधने व इतर महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या. वस्ती दाट असल्याने आणि घरे अगदी लागून असल्याने आग पसरायला वेळ लागला नाही. ही सर्व घरे कच्ची असल्याने आग लवकर पसरत गेली. सर्वस्व हिरावलेया आगीत अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. पदरमोड करून जमा केलेली पुंजी आगीने गिळंकृत केली. कुणाचे दागिने गेले, तर कुणाची कागदपत्रे जळाली. कापड, धान्य, पुस्तके, पासबुक, भांडी यातील काहीही वाचविता आले नाही. शाकीर शाह जाकीर शाह यांनी बँकेत टाकण्यासाठी म्हणून ६0 हजार रूपयांची रक्कम घरीच ठेवली होती. ती आगीत स्वाहा झाली. नासीर शाह गुलजार शाह यांचीही पाच हजार रुपयांची रक्कम भस्मसात झाली.अनेकांकडून मदतघटनेचे वृत्त कळताच अनेकांनी धाव घेऊन बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. आमदार सुभाष धोटे, कृषी सभापती अरुण निमजे, उपविभागीय अधिकारी शिरीष पांडे, तहसीलदार वलसरे, सरपंच सुमनबाई आत्राम, उपसरपंच पापय्या पोन्नमवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तलाठी वाटेकर व ग्रामविकास अधिकारी भडके यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असून सात दिवसंसाठी तात्पुरती मदत देण्याचे आदेश आमदार सुभाष धोटे यांनी दिले असून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सध्या सर्व पीडितांसाठी राहण्याची सोय जि.प. शाळेत करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
गडचांदुरात आगीचे तांडव - १३७ झोपड्या जळून खाक
By admin | Updated: June 1, 2014 00:59 IST