जिल्ह्यात बर्ड फ्लूने कोंबड्या दगावल्याने या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने रवींद्र ठाकरे यांनी ही समिती स्थापन केली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, पशुधन विकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख आणि पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
बर्ड फ्लूच्या संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी दक्षता घेणे, समितीच्या कामकाजामध्ये समन्वय साधणे, बाधित क्षेत्रात पंचनामा करणे, आवश्यक साहित्याचा साठा करणे, बाधित वस्तूंची विल्हेवाट लावण्याची जागा उपलब्ध करून देणे, क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे, नमुने पुणे येथे पोहोचविण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करणे, या जबाबदाऱ्या या समितीला पार पाडाव्या लागणार आहेत.