नागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. परंतु या योजनेचे कार्यालय सहा ते आठ तासांसाठी उघडे राहत असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. विशेष म्हणजे, रात्री-बेरात्री लाभार्थी असलेल्या गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याला याचा लाभ मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. गोरगरीब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली ही योजना नागपूर जिल्ह्यात तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. खासगी इस्पितळांत या योजनेतील आरोग्य मित्रांची वेळ ठराविक आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारे हे केंद्र सायंकाळी ५ वाजताच बंद होते. या वेळेत योजनेतील लाभार्थी आलाच तरच त्याला याचा लाभ मिळतो, अन्यथा त्याला पदरमोड करून उपचार घ्यावा लागतो किंवा दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते. सूत्राने दिलेल्या महितीनुसार, एका इस्पितळात रात्री हृदयविकाराचा एक रुग्ण भरती झाला. त्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. रुग्णाचे नातेवाईक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करण्याची विनंती करीत होते. परंतु डॉक्टर केंद्र बंद झाल्याचे कारण देत होते. पैसा जमा करा किंवा मेडिकलमध्ये न्या, असा सांगितले जात होते. अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनी पैशांची जमवाजमव करून तिथेच उपचार घेतला. रुग्णाचा जीव वाचला तरी कर्जात अडकला. असेच प्रकार इतरही इस्पितळात होत असल्याच्या तक्रारी आहेत.नियमानुसार राजीव गांधी जीवनदायी योजनेत इमरजन्सी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी केंद्र सुरू असण्याची गरज नाही. योजनेत समाविष्ट इस्पितळांना ‘इआयटी’ (इमरजन्सी टेलिफोनिक इन्टिमेशन) नंबर दिले आहेत. डॉक्टरांना या दूरध्वनीवरून फक्त माहिती देऊन लाभार्थ्यांवर उपचार सुरू करायचे असतात, तर रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक दस्तावेज ७२ तासांत इस्पितळे जमा करायचे असतात. परंतु काही खासगी इस्पितळे पैशाचा मोहापायी आणि कटकट कोण लावून घेणार यासाठी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
इमर्जन्सी रुग्ण जीवनदायीपासून वंचित
By admin | Updated: March 16, 2015 02:30 IST