विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता : निकाल लागल्यानंतर सुरू होणार प्रक्रिया
नागपूर : ‘सीबीएसई’ दहावीच्या निकालानंतर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेच्या निकालांची प्रतीक्षा सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेशाची अगोदरपासूनच उत्सुकता दिसून येत आहे. यंदा विज्ञान व द्विलक्षीप्रमाणेच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा अर्जांमधील रंगाची संख्यादेखील वाढली आहे. एकूणच यंदाची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीची परीक्षा पाहणारी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. शहरातील १७० कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान, द्विलक्षी, कला व वाणिज्य शाखांतील ३९ हजार ७८० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत द्विलक्षी व विज्ञान शाखांचे प्रवेश या प्रक्रियेतून झाले. त्यामुळे शाखानिहाय रंगीत अर्जांची संख्या मर्यादित होती. परंतु यंदा शाखा वाढल्या आहेत. त्यामुळे शाखा व माध्यमनिहाय निरनिराळ्या रंगांचे प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने प्रवेश प्रक्रिया रंगारंग स्वरूपाची होणार आहे. कुठल्या शाखेसाठी व माध्यमासाठी नेमका कोणत्या रंगाचा अर्ज देण्यात येईल, हे ठरविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पटवे यांनी दिली. राज्य मंडळाचे दहावीचे निकाल जाहीर झाले की लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) समितीची परीक्षा इतक्या मोठ्या प्रमाणावर जागांची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे केंद्रीय प्रवेश समितीसमोर आव्हानच आहे. मागील वर्षी केवळ विज्ञान व द्विलक्षीसाठी ही प्रक्रिया असतानादेखील पालक व विद्यार्थ्यांकडून काही ठिकाणांहून नाराजीचा सूर आला होता. यंदा तर वाणिज्य व कला शाखेचादेखील यात समावेश झाल्याने समितीची जबाबदारी आणखी वाढली आहे. संपूर्ण प्रक्रियेचे योग्य नियोजन करण्यात आले असून, विद्यार्थी हितालाच सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन डॉ.पटवे यांनी दिले.