जर एकूण उत्पन्नातच घट झाली असेल तर घोषणा पूर्ण करणारा निधी आणणार कुठून, शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार कशी, आणि सिंचन योजना पूर्ण करण्याचे स्वप्न साकारणार कसे, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेती उत्पादनाच्या खर्चावर आधारित भावापेक्षा ५० टक्के अधिक भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करू, असे आश्वासन देऊन भाजपने सत्ता काबीज केली. आधी अडीच पट भाव कमी केला अन् आता दीड पट भाव वाढवू म्हणतात यावर शेतकऱ्यांनी कसा विश्वास ठेवायचा, असा सवालही राजेंद्र मुळक यांनी केला आहे. एकीकडे इंडियाची व आत्मनिर्भर घोषणा करणारे हे सरकार दुसरीकडे एफडीआयला प्रोत्साहन देत आहे. नोकरदार वर्गाला कोणताही दिलासा न देणाऱ्या भांडवलदारांना मात्र भरीव सूट देत आहेत. जे दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होते ते बेरोजगारी वाढवत आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडणारा हा कोरडा अर्थसंकल्प असल्याचे राजेंद्र मुळक यांनी स्पष्ट केले आहे.
आश्वासनांचा पाऊस पाडणारा कोरडा अर्थसंकल्प : राजेंद्र मुळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST