मंगेश व्यवहारे ल्ल नागपूरशुक्रवारी रात्रभर जागून कर्तव्य बजावले. घरी परतलो तेव्हा चांगलेच उजाडले होते. अंग टाकताच पटकन डोळा लागला...अन् तासाभरातच ती दुर्दैवी बातमी पोहोचली...टीव्ही लावल्यावर निसर्गाच्या तांडवाची तीव्रताही कळली...मायभूमीचे ते उद्ध्वस्त चित्र पाहावत नव्हते...आणि तिकडे राहणाऱ्या आप्तस्वकीयांचे फोनही लागत नव्हते. त्यांच्या चिंतेने तेव्हा जी झोप उडाली ती अद्याप लागलीच नाही...नागपुरात राहणारे गोरखा बांधव त्यांची व्यथा सांगत होते. नेपाळमधील भूकंपाच्या दुर्दैवी घटनेनंतर लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती त्यांची अस्वस्थता. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे उपराजधानीही हादरली आहे. नागपुरात मोठ्या संख्येने राहणारे नेपाळी कुटुंबांना तर धक्काच बसला आहे. घटनेनंतर आप्तस्वकीयांचा हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र नातेवाईकांशी संपर्कच होत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. अद्यापपर्यंत तरी नागपुरात राहणाऱ्या गोरखा कुटुंबीयांच्या नातेवाईकांची या घटनेत हानी झाली नसल्याची माहिती आहे. परंतु संपर्कच होत नसल्याने हृदयाची धडधड वाढतेच आहे. हे बापडे डोळ्यात प्राण आणून टीव्हीकडे बघत आहेत. तुकडोजी चौकातील ईएसआय क्वॉर्टरमध्ये राहणारे धनबहाद्दूर बगाले नेपाळच्या पिवठाणा जिल्ह्यातील आहेत.
उद्ध्वस्त मायभूमीचे चित्र पाहवत नाही!
By admin | Updated: April 27, 2015 02:20 IST