खबरदारी गरजेची : प्रवासात चुकाल तर जीवनाला मुकालनागपूर : उन्हाळ्यात प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाली आहे. अनेक प्रवासी कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारताना कोचखाली पडून गंभीर जखमी होतात. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दोन दिवस बेशुद्ध होतात; तर उशिरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यामुळे धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करून थेट मृत्यूलाच आव्हान देतात. अशा असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीच सावधानी बाळगत नसल्यामुळे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.रेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांसोबत अनेक प्रकारच्या घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेते. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची लूट करते. अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. परंतु त्या नियमांकडे डोळेझाक केल्यामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊन आपला बचाव करण्याची गरज आहे.ही घ्या काळजीअवैध व्हेंडरला म्हणा ‘नो’रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्हेंडर्सची नियुक्ती केलेली असते. यासाठी त्यांना रीतसर खाद्यपदार्थ विकण्याचा परवाना आणि ओळखपत्र रेल्वेकडून देण्यात येते. परंतु अनेकदा रेल्वेगाड्यात कुठलाही परवाना नसताना अनेक अवैध व्हेंडर्स खाद्यपदार्थ विकताना दिसतात. त्यांच्याकडील चटपटीत खाद्यपदार्थ दिसले की प्रवाशांच्या जिभेला पाणी सुटते. कुठलाही विचार न करता प्रवासी खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. परंतु अशाप्रकारे विकत घेतलेल्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रवाशाने असे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध होतात. त्याचा फायदा घेऊन त्यांचे महागडे साहित्य, पैसे चोरीला जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अधिकृत व्हेंडर्सकडून खाद्यपदार्थ विकत घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)रेल्वे रुळ ओलांडणे मृत्यूला आमंत्रणरेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे रेल्वे अॅक्ट १४७ नुसार गुन्हा आहे. अनेकदा प्रवासी फूट ओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडतात. रेल्वे रुळावरून जाण्याचा पहिला हक्क रेल्वेगाडीचा आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून थेट रेल्वे रुळ ओलांडतात. रुळावरून येणाऱ्या रेल्वेगाडीखाली चेंगरून अनेक प्रवाशांची जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजचा वापर करणे गरजेचे आहे.महागडे दागिने घालून टाळा झोपप्रवासात अनेक महिला महागडे दागिने पर्समध्ये ठेवून बर्थवर खुशाल झोपी जातात. झोपेचा फायदा घेऊन अशा महिलांचे दागिने चोरट्यांनी गहाळ करण्याच्या घटना रेल्वेगाड्यात नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासात महागडे दागिने घालून किंवा पर्समध्ये ठेवून झोपणे म्हणजे चोरीला निमंत्रण देणे होय.बर्थचे आमिष दाखवून लूटअनेकदा प्रवाशांचे तिकीट कन्फर्म नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळत नाही. परंतु असे प्रवासी रेल्वेस्थानकावर भामटे हेरतात. बर्थ पाहिजे का अशी विचारणा करतात. प्रवाशाने होय म्हटले की त्यांच्याकडून पैसे उकळतात, बर्थ क्रमांक घेऊन येतो म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवतात. मात्र त्यानंतर त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करून आणि बर्थ मिळवून देण्याचे पैसे घेऊन पळ काढतात. अशा प्रकारे अनेक प्रवाशांची लूट झाल्याची उदाहरणे आहेत. रेल्वेगाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर टीसीशिवाय कुणीही बर्थ मिळवून देऊ शकत नाही. परंतु ही साधी बाब प्रवाशांच्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांची फसवणूक होते.
थेट मृत्यूलाच नका देऊ आव्हान!
By admin | Updated: April 24, 2016 03:15 IST