लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एप्रिल २००९ ला लोकसभा निवडणुकीत ७ कोटी २९ लाख ५४ हजार मतदार होते तर ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख ६८ हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले होते ! तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? असे प्रत्युत्तर राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार वाढीवर काॅंग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर आकड्यांनिशी प्रत्युत्तर दिले.
बावनकुळे म्हणाले, २००४, २००९ ला काॅंग्रेस जिंकली तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत. आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं.आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.