दोन आठवड्यात दुसरा आदेश : उलटसुलट चर्चेला उधाणनरेश डोंगरे नागपूरपोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस निरीक्षकांच्या दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या बदली आदेशाला पद्धतशीर ‘खो’ देऊन मुंबई-पुण्यातील २५ पोलीस निरीक्षकांनी आपल्या बदलीचे ठिकाण बदलून घेतले. काही जुगाडू पोलीस निरीक्षकांनी तर आपली बदली रद्द करून आहे त्याच ठिकाणी स्वत:ची ‘पुनर्बदली’ करून घेण्यात यश मिळवले. काही पोलीस निरीक्षकांनी गडचिरोली, गोंदिया सोडाच नागपूर, अकोलासारख्या शहरात जाण्यास असमर्थता दर्शवून (बदली रद्द करून घेत) दबंगगिरीचा परिचय दिला. १२ दिवसात झालेल्या या बदलीच्या हेराफेरीमुळे राज्यातील पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातून ३० मे २०१५ ला ३३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जारी करण्यात आली. राज्यातील सर्वच पोलीस आयुक्तालय, परिमंडळं, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), लोहमार्ग पोलीस (जीआरपी) मधील पोलीस निरीक्षकांचा त्यात सहभाग होता. ३१ मे रोजी ही यादी जवळपास प्रत्येकच पोलीस निरीक्षकाच्या हातात होती. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकास घटक प्रमुखाने तातडीने कार्यमुक्त करावे आणि बदली झालेल्या निरीक्षकाने तातडीने (विहित मुदतीत) बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश बदली आदेशाच्या यादीतून पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी दिले होते. मात्र, डीजींच्या या आदेशाला खो देण्यासाठी पोलीस दलात वजन ठेवणारी मंडळी कामी लागली. त्यानंतर विविध कारणे पुढे करीत अनेक पोलीस निरीक्षकांनी आपली बदली ‘तमूक ठिकाणी करू नये. त्या ऐवजी दुसऱ्या ठिकाणी करावी‘, अशी विनंती केली. काहींनी तर, अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी केलेली बदली कशी गैरसोयीची आहे, ते पटवून देत आहे त्याच ठिकाणी (जैसे थे) स्वत:ची वर्णी लावून घेण्यात यश मिळवले. या पार्श्वभूमीवर, तब्बल २५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये फेरबदल करण्यात आले. त्यासाठी ७१ पोलीस निरीक्षकांच्या बदलीची नवी यादी १२ मे च्या सायंकाळी पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आली.आहे त्याच ठिकाणी बदलीशनिवारी - रविवारी पो. निरीक्षकांच्या बदलीची ही सुधारित यादी पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती आली. या यादीत बदलीचे बदल अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले. कारण २५ पैकी ९ जणांची झालेली बदली रद्द करून त्यांची ‘आहे त्याच ठिकाणी बदली‘ करण्यात आल्याचे या यादीत नमूद आहे.अनिल परसराम आडे (यांची ३० मेच्या यादीनुसार पुणे शहरातून सीआयडीत बदली झाली होती. १२ मेच्या यादीत त्यांची सीआयडीऐवजी पुणे शहर अशी बदली झाली आहे.) यांच्यासोबतच विकास दौलत सोनवणे (बृहन्मुंबई ते नांदेड ऐवजी बृहन्मुंबई), काशीनाथ आबासाहेब चव्हाण (जीआरपी मुंबई ते बृहन्मुंबई ऐवजी जीआरपी मुंबई), कुमार भिकाजी चौधरी (सीआयडी ते रत्नागिरीऐवजी सीआयडी), वाल्मिक माणिकराव आव्हाळे (एसीबी ते अकोलाऐवजी एसीबी), सुनील विष्णू पवार (पुणे ते बीडऐवजी पुणे), राजेंद्र भिकाजी काळे (बृहन्मुंबई ते नांदेडऐवजी बृहन्मुंबई), माणिकसिंग प्रयागसिंग पाटील (बृहन्मुंबई ते चंद्रपूरऐवजी बृहन्मुंबई) आणि सुधाकर राजेराम शिंदे (बृहन्मुंबई ते नांदेड ऐवजी बृहन्मुंबई) या पोलीस निरीक्षकांचा त्यात समावेश आहे.नागपूर, विदर्भाला नकारमुंबई , पुण्याकडील अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त गोंदिया-गडचिरोलीच्या नुसत्या नावानेच कापरे भरते. मात्र, गडचिरोली-गोंदियाच काय, मुंबई पुण्याच्या ‘नाईट लाईफ‘मध्ये खूष असलेले अनेक अधिकारी नागपूर विदर्भात फिरकायला तयार नसतात. इकडे झालेली बदली येनकेनप्रकारे रद्द करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ३० मेच्या बदलीच्या यादीतील प्रमोद सईल (बृहन्मुंबई ते अकोला ऐवजी ठाणे), विजय खैरे (बृहन्मुंबई ते नागपूर ऐवजी मरोळ), संजय पंढरीनाथ सातव (ठाणे ते नागपूरऐवजी पुणे) या निरीक्षकांनी आपली झालेली बदली रद्द करून घेण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, विदर्भातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीचे ठिकाण बदलवून देण्याची भावना वरिष्ठांकडे व्यक्त केली. त्यामागचे कारणही स्पष्ट केले. मात्र, विदर्भातील एकाही निरीक्षकाच्या बदलीत फेरबदल झाला नाही. मुंबई-पुण्यातील उपरोक्त निरीक्षकांच्या बदल्याचे ठिकाण मात्र बदलविण्यात आले. ‘त्या मागे‘ कोणते ठोस कारण आहे, ते कळायला मार्ग नाही. गृहविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात चौकशी केली असता ‘डीजी आॅफीस‘मध्येच ते कळेल, असे हे अधिकारी (नाव न छापण्याची अट घालत) म्हणाले.
‘डीजीं’च्या आदेशाला ‘पीआय’चा खो !
By admin | Updated: June 15, 2015 03:03 IST