आपसात का लढता : गुन्हेगारांचा सामना करा
नरेश डोंगरे - नागपूर
एकमेकांच्या ‘हप्त्यांवर’ हात मारणे, मांडवलीसाठी एक दुसर्यांवर कुरघोडी करणे आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे परस्परांशी हाणामारी करणे हे प्रकार पोलीस ठाण्यांसाठी नवीन नाहीत. अगदी ताजे उदाहरणे पाहिजे असेल तर एमआयडीसी, प्रतापनगर, सीताबर्डी, गणेशपेठ ठाण्यात झालेल्या घटनांची देता येतील. पोलीस ठाण्यातील ही बेशिस्त, तेथील उर्मटपणा संपविण्याचे कधी प्रयत्नच होताना दिसत नाहीत. त्यामुळेच ही मंडळी एकमेकांना ठाण्यातच बदडून काढण्याचा निर्ढावलेपणा दाखवते. रविवारी कळमना ठाण्यातील दोन पोलिसांनी एकमेकांना बदडून काढण्याची घटना या निर्ढावलेपणालाच अधोरेखित करणारी ठरते. पोलीस ठाण्यात येणार्या विविध प्रकरणात रोज होणार्या मांडवल्या आपल्या मध्यस्थीने व्हाव्या, त्यातील जास्तीतजास्त माल आपल्या खिशात यावा, असे पोलिसांना वाटते. तेथूनच एकमेकांवर खुन्नस खाणे सुरू होते. परिणामी कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात दरमहिन्याला पोलिसांची वर्दीतच कुस्ती बघायला मिळते. कळमना ठाण्यात रविवारी मेघनाथ विश्वनाथ चरडे (वय ३७) आणि नागोराव तुळशीराम इंगळे (वय ५१) या दोन पोलीस कर्मचार्यांमधील ‘फ्री स्टाईल’ याच खुन्नसचा भाग होय. गेल्या आठवड्यात एमआयडीसी ठाण्यात एका एएसआयने तेथील एक कर्मचारी समोर उभा असूनही त्याची गैरहजेरी लिहिली. सदर कर्मचार्याने त्याबाबत जाब विचारला असता, एएसआयने त्याला शिवीगाळ करून ‘कानाखाली’ वाजविण्याची धमकी दिली. तत्पूर्वी याच एएसआयने तेथील पोलीस निरीक्षकाला (येथून बदली झालेल्या) जोरदार शिवीगाळ करून ‘अॅट्रोसिटी’ची धमकी दिली होती. हा एएसआय सध्या एमआयडीसीतील ‘भाई’ म्हणून कुख्यात आहे. प्रत्येक वादग्रस्त प्रकरणात मांडवली करण्यासाठी त्याचा पुढाकार असतो. त्याच्याविरुद्ध कुणी आवाज मोठा केला तर आपल्या चेल्याचपाट्यांना तो संबंधितांवर छुलवतो. पोलीस अधिकार्यांना माहीत असूनही त्याच्यावर कारवाई करण्याचे टाळले जात असल्याने त्याच्या खुनशी वृत्तीत वाढ होत आहे. प्रतापनगर ठाण्यातील दोन अधिकारी आणि त्यांच्या गटातील वाद अन् त्यांच्यातील खुन्नस सर्वश्रुत आहे. सीताबर्डीत खुद्द ठाणेदारानेच गटबाजी करून ठेवल्याचा आरोप होतो. अमूक अधिकार्याचे ऐकायचे नाही, तमूक अधिकार्याला गिनायचे नाही, असे त्यांनी कर्मचारी आणि त्यांच्या दोन लाडक्या पीएसआयला सांगून ठेवल्याचे बोलले जाते. म्हणून ‘ते’ दोन पीएसआय ठाण्यात अरेरावीने वागतात. परिणामी त्यांच्याबाबत अनेकांच्या मनात खुन्नस आहे. लाजिरवाणे प्रकार घडू नये ही घटना अतिशय लाजिरवाणी आहे. तिचे स्वरूप केवळ हाणामारीपुरते मर्यादित असेल, असे वाटत नाही. त्यामुळे या घटनेच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. कळमनाच नव्हे तर अन्य पोलीस ठाण्यात असे लाजिरवाणे प्रकार घडू नये, यासाठीही प्रयत्न केले जातील. कौशलकिशोर पाठक पोलीस आयुक्त